नाना पटोले यांच्या पाठोपाठ अमित देशमुखांचेही स्वबळाचे संकेत, औरंगाबाद महापालिकेबाबत विचार सुरु असल्याचाही दावा

| Updated on: Jul 16, 2021 | 3:57 PM

स्वत:चा पक्ष वाढवण्याची इच्छा प्रत्येकाला अशते. आपला पक्ष मोठा असावा असं प्रत्येकाला वाटतं आणि त्यासाठी प्रयत्न करण्यात काही गैर नाही, अशा शब्दात देशमुख यांनी नाना पटोले यांच्या स्वबळाच्या नाऱ्याला पाठिंबा दर्शवला आहे.

नाना पटोले यांच्या पाठोपाठ अमित देशमुखांचेही स्वबळाचे संकेत, औरंगाबाद महापालिकेबाबत विचार सुरु असल्याचाही दावा
वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख
Follow us on

औरंगाबाद : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर महाविकास आघाडीमध्ये मोठी खळबळ माजल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी काँग्रेस नेते आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनीही स्वबळाचे संकेत दिले आहेत. स्वत:चा पक्ष वाढवण्याची इच्छा प्रत्येकाला अशते. आपला पक्ष मोठा असावा असं प्रत्येकाला वाटतं आणि त्यासाठी प्रयत्न करण्यात काही गैर नाही, अशा शब्दात देशमुख यांनी नाना पटोले यांच्या स्वबळाच्या नाऱ्याला पाठिंबा दर्शवला आहे. (Amit Deshmukh also made an important statement on Elections)

स्वबळाच्या नाऱ्याचा गैरअर्थ काढणं चुकीचं आहे. आमच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे महाविकास आघाडी सरकारला कुठलाही धोका नाही, असा दावाही देशमुख यांनी यावेळी केलाय. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसनं स्वबळावर लढावं ही पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. त्याबाबतही निश्चितपणे विचार केला जाईल, असा दावाही देशमुख यांनी केलाय. ते आज औरंगाबादेत बोलत होते.

प्रफुल्ल पटेल यांचा नाना पटोलेंना टोला

दरम्यान, नाना पटोले हे सातत्याने स्वबळाचा नारा देत आहे. त्यावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून पटोले यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. नागपुरात प्रफुल्ल पटेल यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा टोला लगावला. काँग्रेसकडून वारंवार स्वबळाची भाषा केली जात आहे. त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे?, असं पटेल यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी नानांना टोले लगावले. ज्यांना जे करायचं त्यांनी ते करावं. कुणीच कुणाला बांधून ठेवलं नाही. ही आघाडी आहे. ज्या पक्षाला जे करायचं त्यांनी ते करावं. त्यावर आम्ही रोज रोज उत्तरं का द्यावीत?, असा सवाल पटेल यांनी केला.

अशोक चव्हाण यांचे कानावर हात!

अशोक चव्हाण नांदेडमध्ये आल्याने पत्रकारांनी त्यांना गाठलं अन् थेट नाना पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याबाबतच प्रश्न केला. मात्र, त्यावरील चव्हाण यांचं अनपेक्षित उत्तर ऐकून पत्रकारही अवाक् झाले. नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिलाय याबाबत आपल्याला काही माहिती नाही, असं चव्हाण यांनी बिनदिक्तपणे सांगितलं. हा विषय आता संपला असून आमचे सरकार पाच वर्षे टिकेल, असा दावाही चव्हाण यांनी केलाय. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

संबंधित बातम्या :

VIDEO: तुम्ही खरच एकटं लढणार आहात का?…तसं स्पष्ट सांगा; पवारांची काँग्रेस नेत्यांना विचारणा

VIDEO: थोरात साहेब, तुम्ही आम्हाला जेवायला बोलवा, आम्ही स्वबळावर जेवायला येऊ; मुख्यमंत्र्यांचे काँग्रेस नेत्यांना चिमटे

Amit Deshmukh also made an important statement on Elections