चौकशी जयंत पाटलांची अन् निशाणा रोहित पवारांवर; राम शिंदे नेमकं काय म्हणाले?

| Updated on: May 22, 2023 | 5:20 PM

Ram Shinde on Rohit Pawar : जयंत पाटलांच्या ईडी चौकशीवर बोलताना रोहित पवारांवर निशाणा; राम शिंदे यांची सविस्तर प्रतिक्रिया

चौकशी जयंत पाटलांची अन् निशाणा रोहित पवारांवर; राम शिंदे नेमकं काय म्हणाले?
Follow us on

अहमदनगर : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज ईडी चौकशी होतेय. त्यावर भाजपचे आमदार राम शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या ईडी चौकशीवर बोलताना त्यांनी रोहित पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे. तर सुप्रिया सुळे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर देखील त्यांनी टीका केली आहे.

ईडीच्या चौकशी अशा पद्धतीने लागते त्याच्यावरती अनेक दिवस चिकित्सा केली जाते. ज्यावेळी संशयात्मक काही गोष्टी आढळून येतात. त्याचवेळी ईडीची चौकशी लागते. चुकीचं केलं असेल तर सजा ही भोगावीच लागेल काही केलं नसलं तर ते निर्दोष सुटतील, असं राम शिंदे म्हणाले आहेत.

अनेक लोकांना ईडीची चौकशी लागते. मात्र अशा पद्धतीने शक्ती प्रदर्शन करण्याची आवश्यकता नाही. विनाकारण लोकांसमोर हा तमाशा मांडायचा आणि आम्ही धुतल्या तांदळासारखे आहोत, असं दाखवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. पण हे योग्य नाही, असं राम शिंदे म्हणालेत.

आयएल अँड एफएस प्रकरणी जयंत पाटील यांची पडताळणी सुरू आहे. आयएल अँड एफएस कंपनीमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.  या प्रकरणी जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीवर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटक निकालानंतर पराभव झाला म्हणून ही कारवाई केली जात आहे. जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत जर त्यांच्यावरच कारवाई होत असेल तर काही लोकं घाबरतील. काही लोकांना भीती वाटेल म्हणून कारवाई करण्यात आली असं लोकांचं मत बनलं आहे. पवार साहेबांना जेव्हा पत्र आलं तेव्हा कार्यकर्ते कार्यालयाच्या बाहेर होते. वेगवेगळ्या पद्धतीने संपर्क केला जातो. त्यामुळे भेदभाव करणं योग्य नाही, असं रोहित पवार म्हणाले. त्यावर राम शिंदे यांनी उत्तर दिलं आहे.

रोहित पवारांचं बालिशपणाचं वक्तव्य आहे. त्यांना कर्नाटकच्या निवडणुकीवर बोलण्याचा अधिकार नाही कारण त्यांना उमेदवार उभे करता आले नाहीत. त्यांनी निवडणुकीच्या निकालावर बोलू नये, असं राम शिंदे म्हणालेत.

तर आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांच्यावर देखील राम शिंदे यांनी निशाणा साधला आहे. विरोधी पक्षाचा दबाव आणण्याचा प्रयत्न आहे, तर राजकीय मंडळी राजकारण करतात, असं ते म्हणालेत.