राष्ट्रवादीवर दावा सांगण्यासाठी अजित पवार मैदानात, आमदार आणि जिल्हा अध्यक्षांना दिलं प्रतिज्ञापत्राचं टार्गेट

निवडणूक आयोगाने अजित पवार आणि शरद पवार गटाला प्रतिज्ञापत्र देण्यास अद्याप सांगितलेले नाही. अजित पवार यांनी पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे.

राष्ट्रवादीवर दावा सांगण्यासाठी अजित पवार मैदानात, आमदार आणि जिल्हा अध्यक्षांना दिलं प्रतिज्ञापत्राचं टार्गेट
ajit pawar
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 28, 2023 | 9:45 AM

मुंबई | 28 जुलै 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता पक्षावर दावा सांगण्यासाठी दोन्ही गट आमनेसामने आले आहेत. दोन्ही गटाकडून पक्षावर दावा सांगण्यात आला आहे. अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केल्यानंतर त्यावर आयोगाने शरद पवार यांच्या गटाला नोटीस पाठवून म्हणणं मांडण्यास सांगितलं आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार यांना नोटीस बजावताच उपमुख्यमंत्री अजित पवार कामाला लागले आहेत. अजित पवार यांनी थेट प्रतिज्ञापत्रं जमा करण्यासाठी जुळवाजुळव सुरू केली आहे. त्यामुळे आता शरद पवार गट काय निर्णय घेतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदार आणि जिल्हाध्यक्षांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. राष्ट्रवादी पक्षाचा ताबा आणि चिन्ह मिळवण्यासाठी अजित पवार यांनी आमदार, खासदार आणि जिल्हाध्यक्षांना प्रतिज्ञापत्र तयार करण्याचे टार्गेट दिले आहे. आमदारांनी 10 हजार आणि जिल्हाध्यक्षांना 5 हजार शपथपत्र भरून देण्याचं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे. जास्तीत जास्त शपथपत्र भरून देण्यासाठी अजित पवार गटाकडून आवाहन करण्यात आलं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगात गेल्यानंतर अजित पवार गटाकडून कागदपत्रांची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.

आयोगाने मागण्या आधीच…

दरम्यान, निवडणूक आयोगाने अजित पवार आणि शरद पवार गटाला प्रतिज्ञापत्र देण्यास अद्याप सांगितलेले नाही. अजित पवार यांनी पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. त्यावर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नोटीस बजावून त्यांचं म्हणणं मांडण्यास सांगितलं आहे. मात्र, आज ना उद्या प्रतिज्ञापत्र गोळा करावेच लागणार आहे, हे गृहित धरून अजित पवार गटाने प्रतिज्ञापत्र गोळा करण्यास सुरुवात केली आहे. जास्तीत जास्त प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे सादर करून पक्षावर दावा सांगण्याचा अजित पवार गटाकडून प्रयत्न होत असून त्याला शरद पवार गट कसे प्रत्युत्तर देतो हे पाहावे लागणार आहे.

जे शिंदे आणि ठाकरे गटात झालं…

शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट निर्माण झाले. या दोन्ही गटाने पक्ष चिन्ह आणि पक्षावर दावा सांगितला. त्यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला संख्याबळ सादर करण्यासाठी प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितलं. त्यानुसार दोन्ही गटाने प्रतिज्ञापत्रं सादर केली. त्यानंतर निवडणूक आयोगाने सुनावणी करून शिंदे गटाला शिवसेनेचं चिन्ह आणि पक्षाचा ताबा दिला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. जे शिंदे आणि ठाकरे गटात झालं, त्याचीच पुनरावृत्ती आता राष्ट्रवादीत होताना दिसत आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचा ताबा कुणाकडे जातो हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us