मंत्रिमंडळ विस्तार केला असता तर मुख्यमंत्री आजारी पडले नसते, अजितदादांचा शिंदेंना मिश्किल टोला; हसत हसत म्हणाले…

| Updated on: Aug 05, 2022 | 7:00 PM

बंड पुकारल्यापासून शिंदे यांचे दौरे सुरुच आहेत. त्यामुळे त्यांना थकवा जाणवत असल्यामुळे डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला शिंदेंना दिलाय. नेमका हाच धागा पकडत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी एकनाथ शिंदेंना मिश्किल टोला लगावलाय.

मंत्रिमंडळ विस्तार केला असता तर मुख्यमंत्री आजारी पडले नसते, अजितदादांचा शिंदेंना मिश्किल टोला; हसत हसत म्हणाले...
आम्ही चांगलं काम करतोय असं अजित पवारच म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उत्तर
Image Credit source: TV9
Follow us on

बारामती : राज्यात सत्तापालट होऊन महिना लोटला तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) होऊ शकलेला नाही. त्यावरुन विरोधी पक्षाचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. अशावेळी शिंदे आणि फडणवीसांच्या दिल्ली वाऱ्या मात्र सुरु आहेत. पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या सोमवारच्या सुनावणीनंतरच मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय होईल अशी शक्यता वर्तवली जातेय. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुक्रवारी थकवा जाणवायला लागला. बंड पुकारल्यापासून शिंदे यांचे दौरे सुरुच आहेत. त्यामुळे त्यांना थकवा जाणवत असल्यामुळे डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला शिंदेंना दिलाय. नेमका हाच धागा पकडत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी एकनाथ शिंदेंना मिश्किल टोला लगावलाय.

‘..तर मुख्यमंत्री आजारी पडले नसते’

अजित पवार म्हणाले की, आज एक महिना उलटून गेला तरीही मंत्रिमंडळ विस्तार होत नाही. फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेच राज्याचा कारभार हाकत आहेत. त्यामुळे काहीही म्हटलं तरी राज्यातील विकासकामं ठप्प झाली आहेत. आता त्यांच्यावर इतका भार आलाय की मुख्यमंत्री आजारी पडत आहेत. कुणीच आजारी पडू नये. मी चांगल्या भावनेनं बोलतोय, राजकारण करत नाही, टीका टिप्पणी करत नाही. पण तोच भार मुख्ममंत्र्यांनी बाकीच्या 40 – 42 लोकांचं मंत्रिमंडळ केलं असतं, तर कामाची वाटणी झाली असती. जो तो पालकमंत्री त्यांच्या जिल्ह्यात कामाला लागला असता, अशी संकटं आल्यावर आढावा बैठका झाल्या असत्या.

मंत्रिमंडळ विस्तारावरुन अजितदादांची टोलेबाजी

त्याचबरोबर या महाराजांनी 40 जणांना घेऊन जाताना सगळ्यांनाच सांगितलं असेल तुला मंत्री करतो, असंही असू शकतं. त्यामुळे कुणाला मंत्री, कुणाला राज्यमंत्री. आता ते 106 भाजपचे त्यांनाही वाटतं मला मंत्रिपद मिळालं पाहिजे. एकतर त्यांना मुख्यमंत्रीपद नसल्यामुळे त्यांच्या आमदाराचे चेहरे इतके पडले की न सांगितलेलं बरं, अशा शब्दात अजित पवार यांनी शिंदे आणि फडणवीसांवर खोचक टीका केली.

एकनाथ शिंदे यांना थकवा, डॉक्टरांचा आरामाचा सल्ला

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून त्यांची धावपळ सुरुच आहे. बंड पुकारल्यानंतर त्यांचे सूरत, गुवाहाटी दौरे झाले. त्यानंतर सत्तास्थापनेसाठी मुंबईत आले. मंत्रिमंडळ विस्तारासाठी दिल्ली दौरे सुरुच आहेत. पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी ते गडचिरोली आणि परिसरातही जाऊन आले. तसंच शपथविधीपासून मंत्रालयात विविध बैठकांचा सपाटा सुरुच आहे. या काळात शिंदे यांनी उसंत घेतली नाही. त्यामुळे शुक्रवारी अचानक त्यांना थकवा जाणवू लागला. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिलाय. त्यामुले शिंदे यांचे कालचे सर्व राजकीय आणि प्रशासकीय कार्यक्रम रद्द केले होते. त्यानंतर आज पुन्हा मुख्यमंत्री शिंदे सक्रीय झाल्याचं पाहायला मिळत आहे.