सगळंच जर माफ करायला लागलो, तर मला कपडे काढून जावं लागेल : अजित पवार

| Updated on: Feb 19, 2020 | 4:38 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar junnar rally) यांनी कर्जमाफीनंतर वीज बिलमाफीच्या मागणीवरुन चांगलीच टोलेबाजी केली.

सगळंच जर माफ करायला लागलो, तर मला कपडे काढून जावं लागेल : अजित पवार
Follow us on

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar junnar rally) यांनी कर्जमाफीनंतर वीज बिलमाफीच्या मागणीवरुन चांगलीच टोलेबाजी केली. “आता सगळंच जर माफ करायला लागलो, तर कपडे काढून मला जावं लागेल. त्यामुळे आपल्याला झेपेल तेवढेच करायचं” असा टोला अजित पवारांनी (Ajit Pawar junnar rally) वीजबिल माफीच्या प्रस्तावावरुन लगावला. ते जुन्नर येथे शिवप्रेमीच्या जाहीर मेळाव्यात बोलत होते.

कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांनी वीजमाफीचा प्रस्ताव भर सभेत मांडला होता. त्यावर अजित पवारांनी सगळंच जर माफ करायला लागलो तर कपडे काढून मला जावे लागेल. त्यामुळे आपल्याला झेपेल तेवढेच करायचं, असा टोला लगावला.

“शिवसेना-भाजप आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार आल्यानंतर, सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन मंत्रिमंडळात काम करत आहेत. या सर्वांना एकत्र घेऊन राज्यामध्ये शरद पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे. आज शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने प्रत्येकाने शिवाजी महाराजांच्या विचाराने काहीतरी शिकण्याची आणि बोध घेण्याची गरज आहे”, असं अजित पवार म्हणाले.

राज्यात महागाई, बेरोजगारी गंभीर होत चालली असताना, सर्वसामान्यांना जगणं महाग झालं आहे. राज्यात एनआरसीच्या समर्थनार्थ आणि विरोधात मोर्चे काढले जातात हे दुर्दैवी आहे. जनतेच्या प्रश्‍नाकडे लक्ष देण्याऐवजी दुसरेच मुद्दे पुढे आणले जातात. यामधून जातीय वाद निर्माण करून तेढ निर्माण होण्याची भीती आहे, असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं.

CAA आणि NRC संदर्भात राज्यात गैरसमज निर्माण करू नये. जोपर्यंत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे, तोपर्यंत राज्यातील जनतेच्या केसालाही धक्का लागणार नाही, असे आश्वासन अजित पवारांनी दिले. राज्यात कारण नसतानाही वेगळे मुद्दे पुढे आणून चर्चा घडवली जाते आणि त्यातून तेढ निर्माण केला जात असल्याचा आरोप अजित पवारांनी केला.

“महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर करण्यात आली. त्यामध्ये दोन लाखांपर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफ करणार असून, त्यासंदर्भातली माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे. आजच त्यावर निर्णय घेणार असून शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याला थेट पैसे जमा केले जाणार आहेत. जे शेतकरी नियमित कर्ज भरत असतात त्यांच्यासाठीही चांगल्या पद्धतीची मदत करु” असं आश्वासन अजित पवारांनी यावेळी दिले.