मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर निशाणा साधलाय. आम्ही कधी पाठीत खंजीर खुपसला आणि तलवार खुपसली, असं म्हणत नाही. नाना पटोले यांचं वक्तव्य हास्यास्पद असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय. यासोबत नाना पटोले यांच्या राजकीय पक्षांतराचा इतिहासही अजित पवारांनी सांगत नाना पटोले यांना आरसा दाखवलाय. त्यामुळे कुणी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसली? यावरुन आता राजकीय चर्चांना उधाण आलंय. नाना पटोले आधी काँग्रेसमध्ये होते, मग भाजपमध्ये गेले त्यानंतर पुन्हा काँग्रेसमध्ये आले. त्यामुळे झाकली मूठ सव्वालाखाची असते, ती प्रत्येकानं झाकून ठेवावी, असा सल्ला अजित पवारांनी नाना पटोले यांना यावेळी दिलाय. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
मधल्या काळात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी आमच्यावर खंजीर खुपसण्याचे आरोप केले. नानाचं हे स्टेटमेन्ट हास्यपद आहे, असं अजित पवार म्हणाले. ते स्वतः आता भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेत. हेडलाईन करण्यासाठी खंजीर वगैरे चांगलं वाटत असेल, असं म्हणत अजित पवारांनी टोला लगावला. महाविकास आघाडीत तिन्ही पक्ष काम करत आहेत. राज्य स्तरावर निर्णय राज्यातले लोकं निर्णय घेतात. जिल्ह्याच्या पातळीवर वेगवेगळ्या गोष्टी घडतात. तिथल्या गोष्टी नीट राहण्यासाठी नेत्यांमध्ये समन्वय असण्याची गरज असल्याचं मत अजित पवारांनी व्यक्त केलंय.
काँग्रेसनेही काही काही ठिकाणी भाजपसोबत संधान बांधलं, मी त्याला फार महत्त्व देऊ इच्छित नाही, असं म्हणत अजित पवारांनीही पलटवार केलाय. जबाबदार नेत्यांनी जबाबदारीनं बोलावं, आपल्या वक्तव्यांचा वेडावाकडा अर्थ निघेल असं काही बोलू नये, असा सल्ला अजित पवारांनी यावेळी नाना पटोले यांना दिलाय. तसंच प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार असून पण तिघांना एकत्र राहूनच बहुमत मिळेल, असंही त्यांनी म्हटलंय.
मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादी काँग्रेस ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पाठीत सुरा खुपसण्याचे काम करीत आहे. आमच्या विरोधात त्यांच्या कुरघोड्या सातत्याने सुरू आहेत. याचा जाब आम्ही त्यांना नक्कीच विचारू!#Gondia #Bhandara #Congress #Election #ZillaParishadElections
— Nana Patole (@NANA_PATOLE) May 11, 2022
दरम्यान, स्थानिक पातळीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सगळंकाही आलबेल नाही, हे देखील अजित पवारांच्या वक्तव्यांमधून स्पष्ट झालंय. नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची कार्यकर्त्यांनी शरद पवारसाहेबांसोबत बैठक झाली होती. जिल्हापातळीवर तिथल्या तिथल्या प्रतिनिधींना आमच्याकडून पवारसाहेबांनी मुभा दिलेली आहे, ते त्यांच्या पातळीवर काम करत आहेत, अशी माहिती अजित पवारांनी यावेळी दिली. त्यामुळे स्थानिक पातळीवर काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशी चुरस पाहायला मिळण्याची शक्यताय. दरम्यान, जिथं दोन पक्षांत अंतर्गत स्पर्धा आहे, तिथं आम्ही एकोप्यानं लढा असं सांगणार. पण जर एखाद्या ठिकाणी दोघं एकमेकांविरोधात स्पर्धा करत असतील, तर कधी कधी कार्यकर्ते ऐकत नाहीत, असंही अजित पवारांनी म्हटलंय.