पवार काका-पुतणे आणि सुप्रिया सुळे एकत्रितपणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

| Updated on: Jun 07, 2019 | 5:29 PM

निरा डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारं पाणी दुष्काळग्रस्त भागाला वळवण्यात येणार आहे. ते पाणी बारामतीसाठीच चालू ठेवावं, यासह इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी ही भेट घेण्यात आली. लोकसभा निवडणुकीनंतर तिघांनीही एकदाच भेट घेण्याची ही पहिलीच वेळ होती.

पवार काका-पुतणे आणि सुप्रिया सुळे एकत्रितपणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. निरा डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारं पाणी दुष्काळग्रस्त भागाला वळवण्यात येणार आहे. ते पाणी बारामतीसाठीच चालू ठेवावं, यासह इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी ही भेट घेण्यात आली. लोकसभा निवडणुकीनंतर तिघांनीही एकदाच भेट घेण्याची ही पहिलीच वेळ होती. दुष्काळ आणि पाणी टंचाईबाबतही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली.

बारामतीचा पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता आहे. कारण, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2009 ला करार बदलत बारामतीला 60 टक्के पाणी दिलं होतं. 2017 मध्येच हा करार संपला होता. मात्र तरीही बारामतीला जाणारं पाणी सुरूच होतं. रणजितसिंह मोहिते पाटील आणि नवनियुक्त खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पाठपुरावा करुन अखेर बारामतीचं पाणी वळवण्यात यश मिळवलंय. पवार काका-पुतण्यांच्या निर्णयाला दोन्ही रणजितसिंहांनी शह दिलाय.

काय आहे पाणी प्रश्न?

वीर भाटघर धरणाच्या उजव्या कालव्यातून 57 टक्के, तर डाव्या कालव्याद्वारे 43 टक्के पाणी वाटपाचं धोरण 1954 च्या पाणी वाटप कायद्यानुसार ठरलं होतं. त्यानुसार उजव्या कालव्यातून सातारा जिल्ह्यातील फलटण, तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यांना पाणी मिळत होतं. डाव्या कालव्यातून बारामती आणि इंदापूर तालुक्याला पाणी मिळत होतं. 4 एप्रिल 2007 रोजी शरद पवार आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2009 मध्ये पाणी वाटपाचा करार बदलला. त्यामध्ये निरा देवघर धरणातून 60 टक्के पाणी डाव्या कालव्यातून बारामती आणि इंदापूर तालुक्याला आणि 40 टक्के पाणी फलटण, माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर तालुक्याला देण्याचा निर्णय घेतला. हा करार 3 एप्रिल 2017 पर्यंतचा करण्यात आला होता. करार संपल्यानंतरही हे पाणी बारामतीला जात होतं.

नियमबाह्य पाणी बंद करुन ते पुन्हा फलटण, माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर तालुक्यांना मिळावे अशी मागणी रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली होती. याबाबत त्यांनी सोमवारी पुन्हा जलसंपदा मंत्री महाजन यांची भेट घेतली.

जलसंपदा मंत्री महाजन यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करुन डाव्या कालव्यातून बारामतीला नियमबाह्य जाणारं पाणी कायमचं बंद करण्याचा निर्णय घेतला. याबाबतचा आदेश येत्या दोन दिवसात काढावा असंही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं. हा अध्यादेश निघाल्यास सातारा जिल्ह्यातील वीर, भाटघर, निरा – देवघर या धरणातून बारामती आणि इंदापूर तालुक्याला जाणारं पाणी कायमस्वरुपी बंद होऊन त्याचा फायदा फलटण, माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यांना 100 टक्के होणार आहे.

संबंधित बातम्या :

रणजितसिंह नाईकांची खेळी, बारामतीला जाणारं नियमबाह्य पाणी बंद

बारामतीला निरेतून मिळणारं पाणी बंद, दोन रणजतिसिंहांचा पवारांना शह

नीरेच्या पाण्यावरुन उद्धव ठाकरेंचा पवारांच्या सुरात सूर