औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर नामांतरावर अजित पवार काय म्हणाले?
औरंगाबाद शहराचं छत्रपती संभाजीनगर असं नामांतर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यावर अजित पवार यांनी मोठं भाष्य केलं. ते आज औरंगाबादेत आहेत.

दत्ता कनवटे, औरंगाबादः छत्रपती संभाजी महाराज (Chatrapati Sambhaji Maharaj) धर्मवीर नव्हते तर केवळ स्वराज्यरक्षक होते, या अजित पवारांच्या (Ajit Pawar) वक्तव्यावरून राजकारणात (Politics) काही दिवसांपूर्वी मोठं वादंग उठलं. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज याच संदर्भाने औरंगाबादेत प्रतिक्रिया दिली. औरंगाबाद शहराचं छत्रपती संभाजीनगर असं नामांतर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यावर अजित पवार यांनी मोठं भाष्य केलं. ते आज औरंगाबादेत आहेत.
अजित पवार म्हणाले, एकमेकांच्या कामात उणी दुणी काढणं, आरेला कारे करण्यापेक्षा सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हणून औरंगाबादच्या विकासाकडे सर्वांनी लक्ष देणं आवश्यक आहे.
आपण औरंगाबाद, संभाजीनगर, धर्मवीर, स्वराज्यरक्षक यातच गुंतून पडतो. दुस्याच्या विषयात नाक खुपसायच्या ऐवजी, खूप चांगलं वातावरण निर्माण होण्याकरिता सगळे यशस्वी होऊ शकतो, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत..
शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळे यांचा निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अजित पवार औरंगाबादेत आले आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयातील निवडणूक दालनात विक्रम काळे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आज पार पडली.
अर्ज भरण्यापूर्वी अजित पवार भाषणात म्हणाले, राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती सावरत असताना आम्ही काही महत्त्वाचे निर्णय घेतले होते. पण त्याची अंमलबजावणी होण्यापूर्वीच आमचे सरकार गेले. त्यामुळे प्रश्न असतील तर ते सोडवण्यासाठी आम्ही मदत करू, असा विश्वास व्यक्त करतो.
राज्यात सध्या जे चाललय, ते फार काही समाधानकारक नाही. 30-30 वर्षांपासून आम्ही राजकारण करतोय, पण सध्याचे प्रकार चांगले नाहीत. वाचाळवीरांना हे लक्षात आणून दिले पाहिजे.
देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष झाली, पण औरंगाबादकरांना पाणी मिळत नाही. या परिसराला मंत्रिमंडळात मोठं स्थान मिळालं आहे, त्यामुळे इथल्या समस्या प्राधान्याने सुटल्या पाहिजेत, असं वक्तव्य अजित पवार यांनी भाषणादरम्यान केलं.
