चर्चा करायला उद्धव ठाकरे कशाला? आम्ही काफी आहोत; अंबादास दानवे यांनी शेलार यांना ललकारले

पाऊस पडतो हे खरं जरी असले तरी राज्यातील काही भाग आहेत जिथे पाऊस नाही. काही ठिकाणी जास्त पाऊस आहे, तर काही ठिकाणी कमी पाऊस आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.

चर्चा करायला उद्धव ठाकरे कशाला? आम्ही काफी आहोत; अंबादास दानवे यांनी शेलार यांना ललकारले
ashish shelar
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 27, 2023 | 11:10 AM

मुंबई | 27 जुलै 2023 : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या मुद्द्यावरून भाजपला घेरल्यानंतर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना मुंबई आणि मुंबई महापालिकेच्या अनुषंगाने काही प्रश्न विचारले आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांना या मुद्द्यांवर चर्चा करण्याचं आव्हानच दिलं आहे. शेलार यांचं हे आव्हान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्वीकारलं आहे. चर्चा करायला उद्धव ठाकरे कशाला आम्ही काफी आहोत, असं प्रति आव्हान देतानाच हायफाय राहणारे लोक आम्हाला काय चर्चेसाठी बोलावणार? असा सवालच अंबादास दानवे यांनी केला आहे.

अंबादास दानवे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप नेत्यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. मंत्रालयात आल्याने काम होते असे झाले असते तर फार परिवर्तन झालं असते. मोदींना विचारा कोव्हिड काळात कुठे कुठे गेले होते? अडीच वर्षात काय केलं हे शेतकऱ्यांना, धारावीमधील जनतेला जाऊन विचारा. तुमचे एवढे खासदार, आमदार असून मतदारसंघात जात नाहीत. केंद्रातील एकाही मंत्र्याला कवडीचे काम नाही. 26 दिवसाचे दौरे त्यांच्या हातात दिले जातात. भाजपचे खासदार आणि मंत्री मतदारसंघात नसतात. केंद्रातल्या आणि राज्यातल्या मंत्र्यांना दळण दळावे लागतेय, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.

तुमचे किती आमदार शिल्लक राहिले ते आधी बघा. तुमचे 105 आमदार तोंड बघत बसतात. कधी मागच्या दरवाजाने जातील कळणार देखील नाही, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

तर तुम्ही निवडूनही येऊ शकत नाही

बाळासाहेब ठाकरे यांना जिवंत असताना त्रास दिला. ज्या बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे तुम्ही जिंकून आलात, त्यांच्या शिवसेनेला गद्दारी करायला तुम्ही भाग पाडले. तुम्हाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचाही अधिकार नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव नाही घेतले तर तुम्ही निवडून येऊ शकत नाही, अशा शब्दात दानवे यांनी भाजपला सुनावले.

अनेक ठिकाणी पाऊस कमी

अधिवेशनाच्या कालावधीवरही त्यांनी भाष्य केलं. अधिवेशन ठरलेलं आहे तेवढं झालं पाहिजे. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पाऊस पडतो हे खरं जरी असले तरी राज्यातील काही भाग आहेत जिथे पाऊस नाही. काही ठिकाणी जास्त पाऊस आहे, तर काही ठिकाणी कमी पाऊस आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. आदिवासी पाड्यात अनेक ठिकाणी रस्ते नाहीत. दोन वेळचे जेवण नाही, असे विदारक सत्य आहे, असंही ते म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us