उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांशी विश्वासघात केला, 12 नोव्हेंबरचा हिशेब कोण देणार? किरीट सोमय्यांचा घणाघात

| Updated on: Nov 30, 2021 | 3:59 PM

अमरावती हिंसाचार प्रकरणावरुन भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केलीय. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी विश्वासघात केल्याचा घणाघात सोमय्या यांनी केलाय.

उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांशी विश्वासघात केला, 12 नोव्हेंबरचा हिशेब कोण देणार? किरीट सोमय्यांचा घणाघात
किरीट सोमय्या, भाजप नेते
Follow us on

अमरावती : त्रिपुरातील कथित घटनेवरुन 12 नोव्हेंबर रोजी अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये मोठा हिंसाचार (Violence) पाहायला मिळाला होता. त्यानंतर 13 नोव्हेंबर रोजी भाजपकडून पुकारण्यात आलेल्या अमरावती बंदवेळीही तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. त्यानंतर अमरावती पोलिसांकडून (Amravati Police) भाजप नेत्यांसह अनेकांवर कारवाई करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणावरुन भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केलीय. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी विश्वासघात केल्याचा घणाघात सोमय्या यांनी केलाय.

शनी मंदिराचं दर्शन घेतलं, मारुतीचं दर्शन घेतलं. इथले पुजारी, महिला भाविकांशी बोललो. त्यावेळी तेथील महिलांनी जे वर्णन केलं ते ऐकून भीती वाटते. दंगलखोरांनी महिलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. जर बाळासाहेब असते तर या दंगेखोरांनी असं केलं नसतं. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी विश्वासघात केला. 1993 मध्ये बाळासाहेब महिलांना वाचवण्यासाठी स्वत: पुढे आले होते, अशा शब्दात सोमय्या यांनी उद्धव ठारकेंवर हल्ला चढवला.

‘यापुढे हिंदूंवर हल्ला झाला तर जबाबदारी ठाकरे सरकारची’

13 नोव्हेंबरच्या हिंसाचाराचा हिशेब मागता. 12 नोव्हेंबरचा हिशेब कोण देणार? 12 तारखेच्या हिंसाचाराला पोलिसांनी परवानगी दिली होती का? मंदिरात पूजा करणाऱ्या पूजाऱ्याच्या हत्येचा प्रयत्न झाला. आज बाळासाहेब नाहीत, पण तेव्हा आम्ही हिंदूंना वाचवण्यासाठी एकत्र होतो. यापुढे हिंदूंवर हल्ला झाला तर त्याची जबाबदारी ठाकरे सरकारची राहील, असा इशाराच सोमय्या यांनी दिला आहे. हिंसाचाराच्या घटनेचा पाठपुरावा करण्यासाठी अमरावती दौऱ्यावर आल्याचं सोमय्या यांनी यावेळी सांगितलं.

31 डिसेंबर रोजी 40 घोटाळे जनतेसमोर आणणार – सोमय्या

ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढण्याची माझ्यावर जबाबदारी आहे. 28 मोठे घोटाळे मी बाहेर काढले. 31 डिसेंबर रोजी 40 घोटाळे जनतेसमोर आणणार, असा इशाराही सोमय्या यांनी दिला आहे. चार मोठ्या मंत्र्यांच्या तक्रारी मी विविध संस्थांकडे केल्या आहेत. दोन शिवसेनेचे आहेत, त्यापैकी एक मुख्यमंत्री मित्र परिवारातील सदस्य आहे. तर विदर्भातील काँग्रेसच्या एका मंत्र्याची फाईल आहे. तर एक मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याचंही सोमय्या यांनी म्हटलंय. तसंच उद्या मी जालन्याला जाणार आहे. अर्जुन खोतकर यांनी शेतकऱ्यांना लुटलं असल्याचा आरोपही सोमय्या यांनी केलाय.

इतर बातम्या :

Video : आमच्या घरातल्या मुलीचं लग्न!, संजय राऊतांसोबत डान्सच्या व्हिडीओवरुन होणाऱ्या टीकेला सुप्रिया सुळेंचं उत्तर

ममता बॅनर्जी तीन दिवसीय मुंबई दौऱ्यावर, उद्योगपतींसह शरद पवार, आदित्य ठाकरे, राऊतांनाही भेटणार