ट्रॅफिकमुळेच 3 टक्के घटस्फोट होतात, हा जावईशोध कुठून लावला? विरोधकांच्या प्रश्नाला मिसेस फडणवीसांचं पुराव्यासह उत्तर

| Updated on: Feb 04, 2022 | 8:28 PM

अमृता फडणवीस यांचा तर्क हास्यास्पद आहे. त्या दरवेळी ऐकावं ते नवलंच अशाप्रकारचं बोलत असतात. आता तर त्यांनी जावईशोध लावला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर हसावं की रडावं असा प्रश्न मुंबईकरांना पडला असल्याची टीका किशोरी पेडणेकर यांनी केलीय. त्यानंतर आता अमृता फडणवीस यांनी एका सर्व्हेचा दाखला देत पेडणेकर यांना प्रत्युत्तर दिलंय.

ट्रॅफिकमुळेच 3 टक्के घटस्फोट होतात, हा जावईशोध कुठून लावला? विरोधकांच्या प्रश्नाला मिसेस फडणवीसांचं पुराव्यासह उत्तर
अमृता फडणवीस
Follow us on

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) आपली वक्तव्ये, ट्वीट आणि महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांवरील टीकेमुळे नेहमी चर्चेत असतात. राज्यातील विविध विषयांवर अमृता फडणवीस आपलं रोखठोक मत व्यक्त करत असतात. आजही त्या आपल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. मुंबईत 3 टक्के घटस्फोट हे ट्रॅफिकमुळे होत असल्याचा दावाच अमृता फडणवीस यांनी केलाय. त्यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी यांनी खोचक टीका केलीय. अमृता फडणवीस यांचा तर्क हास्यास्पद आहे. त्या दरवेळी ऐकावं ते नवलंच अशाप्रकारचं बोलत असतात. आता तर त्यांनी जावईशोध लावला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर हसावं की रडावं असा प्रश्न मुंबईकरांना पडला असल्याची टीका किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी केलीय. त्यानंतर आता अमृता फडणवीस यांनी एका सर्व्हेचा दाखला देत पेडणेकर यांना प्रत्युत्तर दिलंय.

अमृता फडणवीसांकडून सर्वेक्षणाच दाखला

अमृता फडणवीस यांना याबाबत विचारलं असता त्या म्हणाल्या की, तुम्हाला माहिती आहे की मी सर्व्हे एजन्सी तर नाही. एका सर्व्हे एजन्सीमधून मला हा डेटा मिळाला होता. सर्व्हे मंकी डॉट कॉम यांनी सॅम्पलिंग केलं होतं लोकांचं आणि घटस्फोटाबाबत हा डेटा दिला होता की 3 टक्के लोकं हे घटस्फोट घेतात. त्यात अनेक कारणं होती आणि त्यातील एक कारण होतं ट्रॅफिक जॅम. त्यांच्या घरगुती आयुष्यावर परिणाम होत होता. पाच तास, चार तास, तीन तास त्यांचा वेळ ट्रॅफिकमध्ये जात होता. त्यामुळे ते घरी वेळ देऊ शकत नव्हते आणि त्यामुळे घटस्फोट झाले, असा दावा त्यांनी केलाय.

अमृता फडणवीसांचं नेमकं वक्तव्य काय?

मी फडणवीसांची बायको आहे हे तुम्ही विसरून जा. मी सामान्य नागरिक म्हणून बोलते. मी रोज सामान्य स्त्री सारखी घराबाहेर पडते. त्यावेळी मलाही ट्रॅफिक आणि रस्त्यांवरील खड्ड्यांचा त्रास होतो. रस्त्यावर ट्रॅफिक आहे, खड्डे आहेत. ट्रॅफिकमुळे तीन टक्के घटस्फोट होतात. कारण आपण कुटुंबाला वेळ देत नाही. मुंबईत अनेक इश्यू आहेत. मेट्रो, रस्ते, एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत. त्याकडे लक्ष न देता सरकार खिसे भरू लागले तर त्यावर टीका होणारच. तुम्ही या मुद्द्यांवर लक्ष दिलं पाहिजे. ती मुंबईची गरज आहे, असं वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केलं होतं.

अमृता फडणवीसांच्या दाव्यावर महिला वकिलांचं मत काय?

अमृता फडणवीस यांचं वक्तव्य हे खूपच हास्यास्पद आहे. घटस्फोटाची कारणं वेगवेगळी असू शकतात. कुटुंबातल्या अनेक गोष्टी त्याला कारणीभूत असतात. मात्र ट्रॅफिक आणि घटस्फोट यांचा संबंध जुळेल अशी कोणतीही केस आजतागायत कोर्टासमोर आलेली नाही असा आमचा अनुभव सांगतो. ट्रॅफिकमूळे कुटुंबाला वेळ देऊ न शकल्याने घटस्फोट होतात हे खूपच उथळ वाक्य आहे. एकाही दाम्पत्यानं कोर्टामध्ये अस म्हटल्याचं आम्हाला आठवत नाही. गेल्या बारा ते चौदा वर्षांपासून आम्ही फॅमिली कोर्ट मध्ये वकील म्हणून काम पाहतो. मात्र आजपर्यंतच्या आमच्या कामात असा अनुभव आलेला नाही. शिवाय कोर्टानेही तसं निरीक्षण नोंदवल्याच आमच्या माहितीत नाही, अशी प्रतिक्रिया महिला वकील सुजाता सकट, शैला साळुंखे आणि सुनिता शिंदे यांनी व्यक्त केलं आहे.

इतर बातम्या :

नितेश राणे प्रकृती बिघडली? रुग्णालयात ठेवलं जाण्याची शक्यता; तर प्रकृती अस्वास्थ्यावरुन वैभव नाईकांचा जोरदार टोला

‘पक्षासाठी आणि महाराष्ट्रासाठी तुरुंगात जायला आणि मरायलाही तयार’, सोमय्यांच्या आरोपांना उत्तर देताना संजय राऊतांचं वक्तव्य