केंद्राच्या नव्या सूचना, मात्र महाराष्ट्रात ई-पासमध्ये सवलत नाही, सक्ती कायम : अनिल देशमुख

| Updated on: Aug 24, 2020 | 7:14 PM

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्राच्या नव्या सूचनांनंतर महाराष्ट्रातील ई-पासबाबत मोठी घोषणा केली आहे (Anil Deshmukh on E Pass compulsion).

केंद्राच्या नव्या सूचना, मात्र महाराष्ट्रात ई-पासमध्ये सवलत नाही, सक्ती कायम : अनिल देशमुख
Follow us on

रायगड : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ई-पासबाबत मोठी घोषणा केली (Anil Deshmukh on E Pass compulsion). सध्या महाराष्ट्रात ई-पासमध्ये सवलत नसेल. केंद्र सरकारने ई-पासबाबत नव्या सूचना दिल्या आहेत. मात्र, महाराष्ट्रात ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग पाहता ई-पासची सक्ती कायम राहिल, असं मत अनिल देशमुख यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी काही दिवसांनंतर ई-पास धोरणावर पुनर्विचार केला जाईल, असंही नमूद केलं. तो रायगडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

अनिल देशमुख म्हणाले, “केंद्र सरकारने वाहतुकीबाबत काही नवीन मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. मी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बोललो आहे. आपण काही काळ निर्बंध कमी केले. मात्र, त्यानंतर ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वाढला. सुरुवातीला 3 महिने ग्रामीण भागात कोरोना नव्हता. मात्र, निर्बंध कमी केल्यानंतर संसर्गाचं प्रमाण वाढलं. त्यामुळे सध्यातरी महाराष्ट्रात ई-पासबाबत आहे तेच नियम राहतील. काही दिवसांनी यावर पुनर्विचार केला जाईल.”

“रोहा बलात्कार-हत्या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती”

अनिल देशमुख यांनी आज रायगड दौऱ्यादरम्यान रोहा बलात्कार-हत्या प्रकरणातील पीडित कुटुंबाची देखील भेट घेतली. तसेच या प्रकरणी ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करणार असल्याची घोषणा केली. ते म्हणाले, “तांबडी-रोहा प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येईल. या प्रकरणी अॅड. उज्ज्वल निकम यांची सरकारकडून नियुक्ती केली जाईल.” असं असलं तरी ठामपणे किती दिवसात या प्रकरणी आरोपपत्र दाखल होणार हे अनिल देशमुख सांगू शकले नाही.

“ट्रॅक रेकॉर्ड तपासा, महाराष्ट्र पोलिसांना 58 राष्ट्रपती पुरस्कार, बिहारला किती?”

अनिल देशमुख म्हणाले, “महाराष्ट्र पोलीस अतिशय सक्षम आहे. अनेक वर्षांपासून त्यांची तुलना स्कॉटलंड पोलिसांशी केली जाते. त्यांचं ट्रॅक रेकॉर्ड पाहिलं तर महाराष्ट्र पोलिसांना सर्वाधिक 58 राष्ट्रपती पुरस्कार मिळाले आहेत. त्यात तपासाबाबत महाराष्ट्राला 10 पुरस्कार मिळाले आहेत. मला कोणत्याही राज्याची तुलना करायची नाही. पण बिहार पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस यांना त्यांच्या कामासाठी मिळालेल्या पुरस्कारांची माहिती घेतली तर महाराष्ट्र पोलीस किती सक्षम आहेत हे कळेल.”

“आम्ही जेव्हा सुशांत प्रकरण मुंबई पोलिसांकडे दिलं तेव्हा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने याचा तपास केला. सर्वोच्च न्यायालयाने देखील मुंबई पोलिसांनी अतिशय चांगलं काम केल्याचं निरिक्षण नोंदवलं आहे. निकालपत्रात मुंबई पोलिसांनी योग्य तपास केल्याचं म्हटलं आहे. आता हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस सीबीआयला या प्रकरणात सर्व सहकार्य करेल. त्या पद्धतीने सहकार्य करण्याचं काम सुरु आहे,” असंही अनिल देशमुख यांनी नमूद केलं.

संबंधित बातम्या :

‘सामान वाहतूक आणि नागरिकांच्या प्रवासाला ई-पासची गरज नाही’, केंद्र सरकारचे राज्यांना महत्त्वाचे निर्देश

सामान आणि प्रवासी वाहतुकीवरील निर्बंध काढण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु : अनिल देशमुख

Anil Deshmukh on E Pass compulsion