शिवरायांचा पुतळा हटवणारा बोलवता धनी जगाने पाहिला, वर्तन बदला, खोतकरांचा भाजपला इशारा

| Updated on: Aug 09, 2020 | 5:33 PM

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील बेळगावातील मनगुत्ती गावातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आल्यानंतर मनगुत्तीपासून संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे (Arjun Khotkar slams BJP on Chhatrapati Shivaji Maharaj Statue removed in Belgaum).

शिवरायांचा पुतळा हटवणारा बोलवता धनी जगाने पाहिला, वर्तन बदला, खोतकरांचा भाजपला इशारा
Follow us on

जालना : “शिवाजी महाराजांचा पुतळा हटविणारे बोलावते धनी कोण आहेत? तर निश्चितपणे जगाने बघितलं, तिथे भाजप सरकार आहे. त्यांच्या इशाऱ्यावर हे चाललेलं आहे. भाजपचे लोक त्या भागात सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अशा पद्धतीने अपमान करु लागले आहेत”, असा घणाघात शिवसेना नेते आणि राज्याचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केला आहे (Arjun Khotkar slams BJP on Chhatrapati Shivaji Maharaj Statue removed in Belgaum).

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील बेळगावातील मनगुत्ती गावातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आल्यानंतर मनगुत्तीपासून संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. कर्नाटकात भाजप सरकार असल्यामुळे शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

“अंत्यत गंभीर, संतापजनक आणि चीड आणणारी ही घटना आहे. आमचं आराध्य दैवत, देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत अशा प्रकारची हिंमत त्या भागातील नागरिकांची होत असेल तर त्याचे परिणामसुद्धा त्यांना भोगावे लागतील”, असं अर्जुन खोतकर म्हणाले.

“आमच्या सर्वांच्या मनामध्ये प्रचंड चीड आहे. यांचं डोकं ठिकाणावर आहे का? या लोकांना देशातील नागरिकांना गुण्या-गोविंदाने का नांदू द्यायचं नाही?”, असे सवाल अर्जुन खोतकर यांनी उपस्थित केले (Arjun Khotkar slams BJP on Chhatrapati Shivaji Maharaj Statue removed in Belgaum).

“माझी भाजपच्या सर्व वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांना विनंती आहे की, तुमचं वर्तन आणि वागणूक बदला. ते बदललं नाही तर त्याचे दुष्परिणाम किंवा गंभीर परिणाम तुमच्या पक्षाला भोगावे लागतील”, असा इशारा अर्जुन खोतकर यांनी दिला.

“देशातील तरुण, शिवप्रेमींमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. लोक कायदा हातात घ्यायला मागेपुढे बघणार नाहीत. वर्तन बदला नाहीतर परिणामाला सामोरे जा”, असादेखील इशारा अर्जुन खोतकर यांनी भाजपला दिला.

राज्यात शिवभक्त आक्रमक

दरम्यान, बेळगावच्या मनगुत्ती गावातील घटनेनंतर राज्यात कोल्हापूरसह सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, सोलापूर, जालना, नांदेड अशा अनेक जिल्ह्यांमध्ये शिवभक्त आक्रमक झाले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ ठिकठिकाणी निषेध आंदोलने होत आहेत. शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याने महाराष्ट्रातील संतप्त शिवभक्त कर्नाटकात जाऊन आंदोलन करण्याच्या तयारीत दिसत आहेत.

मनगुत्तीमधील मुख्य चौकातही महिला आणि नागरिकांनी एकत्र जमून याचा विरोध केला. राज्यात मराठा क्रांती मोर्चापासून अनेक संघटनांनी रस्त्यावर उतरुन याविरोधात आंदोलन केलं. तसेच कर्नाटकमधील भाजप सरकारचा निषेध केला.

बेळगावच्या मनगुत्तीमधील मुख्य चौकात सकाळपासून महिला आणि नागरिकांनी एकत्र जमून याचा विरोध केला. यानंतर पोलिसांकडून नागरिकांना हटवण्याचे प्रयत्न करण्यात आले. पुतळा हटवल्यानं महाराष्ट्रातील शिवप्रेमींमध्येही संताप बघायला मिळत आहे. मराठा क्रांती मोर्चा, श्रीराम सेनेसह अन्य काही संघटनाचे पदाधिकारी आज मनगुत्ती गावात जाण्याची शक्यताही वर्तवण्यात आली.

सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना पत्र लिहून या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सन्मानपूर्वक त्या जागेवर बसवण्याची मागणी केली आहे. दरम्यान, मनगुत्ती गावातील प्रमुखांनी हा वाद मिटल्याचा दावा केला आहे. तीन गावाच्या बैठकीनंतर पुतळा आहे त्या ठिकाणीच बसवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगण्यात आलं.

संबंधित बातम्या :

कुठं पुतळ्याचं दहन, तर कुठं कर्नाटक सरकारला बांगड्यांचा‌ हार, शिवभक्त आक्रमक

वेळ पडल्यास विरोधीपक्षाच्या नेतृत्वात बेळगावात आंदोलन करु, ते यायला तयार आहेत का? : संजय राऊत