“अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्राचे ‘मेट्रो कारनामे!”, आशिष शेलार यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र

| Updated on: Nov 18, 2020 | 12:22 PM

मेट्रो कारशेड प्रकल्पावरुन भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्याचबरोबर वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरुनही शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना उत्तर देण्याचं आव्हान केलं आहे.

अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्राचे मेट्रो कारनामे!, आशिष शेलार यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र
Follow us on

मुंबई: आरेतील मेट्रो कारशेड प्रकल्प कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावरुन आता जोरदार राजकारण सुरु आहे. कांजूरमार्गच्या प्रस्तावित मेट्रो प्रकल्पाची जागा केंद्राची असल्याचा दावा करण्यात आला होता. तर राज्य सरकारकडून ही जागा आपल्याच मालकीची असल्याचं वारंवार सांगितलं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर ट्विटरद्वारे निशाणा साधला आहे. (Ashish Shelar criticizes CM Uddhav Thackeray and Environment Minister Aditya Thackeray over Kanjurmarg metro car shed project)

‘गारोडिया समूहाचे महेशकुमार गरोडिया यांनी एमएमआरडीएला नोटीस बजावून कांजूर खेड्यातील 500 एकर जागेची आपण भाडेपट्टी केली आहे. त्यामुळे काम थांबवा. तसेच मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी मेट्रो कारशेडसाठी दिलेल्या 100 एकर जमीनीचा आदेश मागे घ्या, अशी नोटीस बजावली आहे’.

‘मुंबई सीटी सिव्हिल कोर्टाने 16 एप्रिल 2016ला या जागेबाबत जैसेथे परिस्थिती ठेवा असे आदेश दिले, असा दावाही गारोडीयांनी केलाय. इंच इंच जमीन महाराष्ट्राची, असे सांगणारे आता गारोडीयाच्या “सातबारा” आडून भूखंडाचा श्रीखंड तर खाणार नाही ना? भूसंपादनच्या नोटीसची वाट तर बघत नाही ना?’, असा सवाल आशिष शेलार यांनी ट्विटरद्वारे विचारला आहे.

“कांजुरमार्गच्या जागेचा निर्णय घेताय तेव्हाच भविष्यातील जागा हस्तांतरणातील 50 हजार कोटींच्या घोटाळ्याची पायाभरणी करताय? असा सवाल त्याचवेळी आम्ही केला. तेच खरे ठरतेय. पेटवायची अस्मिता, खायची मालमत्ता? मुंबईकर हो, अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्राचे हे पहा “मेट्रो कारनामे!”, अशा शब्दात भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.

वाढीव वीज बिलावरुनही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

‘महाविकास आघाडीच्या सरकारने पून्हा एकदा राज्यातील वीज ग्राहकांना, सामान्य नागरिकांना ‘जोर का झटका धीरे से’ अश्या पद्धतीने केलेय. मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आता तुम्हीच राज्याला उत्तर द्या!’, असं थेट आव्हान आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे.

आमदार आशिष शेलार यांच्या टीकेला आता शिवसेनेकडून कोण आणि कशाप्रकारे उत्तर देणार, हे पाहावं लागणार आहे.

संबंधित बातम्या:

‘मेट्रो’वरुन राजकारण तापले; कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडच्या जागेवर केंद्र सरकारने लावला बोर्ड

‘मंद बुद्धी, बहु गर्वी’, मेट्रो कारशेडच्या जागेवरुन अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा

मेट्रो कारशेडची जागा राज्य सरकारचीच; आदित्य ठाकरेंचा दावा

Ashish Shelar criticizes CM Uddhav Thackeray and Environment Minister Aditya Thackeray over Kanjurmarg metro car shed project