Ashish Shelar : ‘मुंबईचा बाप कोण म्हणता मग मुंबईकडे दुर्लक्ष का करता?’ आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल

| Updated on: May 19, 2022 | 4:12 PM

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईचा बाप शिवसेना, असा उल्लेख केला. तोच धागा पकडत आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना खोचक सवाल केलाय. मुंबईचा बाप कोण म्हणता मग मुंबईकडे दुर्लक्ष का करता, असा प्रश्न शेलार यांनी विचारला आहे.

Ashish Shelar : मुंबईचा बाप कोण म्हणता मग मुंबईकडे दुर्लक्ष का करता? आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल
आशिष शेलार यांच्याकडून नालेसफाईची पाहणी
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्यात संपूर्ण राज्याचं लक्ष मुंबई महापालिकेकडे (Mumbai Municipal Corporation) लागलं आहे. सत्ताधारी शिवसेनेसह विरोधी पक्ष असलेल्या भाजप, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसही मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्याचाच भाग म्हणून सभांचा धडाका सुरु झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बीकेसीतील मैदानावर घेतलेल्या सभेत भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) जाहीर सभेतून उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. या सभेत बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईचा बाप शिवसेना, असा उल्लेख केला. तोच धागा पकडत आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना खोचक सवाल केलाय. मुंबईचा बाप कोण म्हणता मग मुंबईकडे दुर्लक्ष का करता, असा प्रश्न शेलार यांनी विचारला आहे.

‘मुंबई असुरक्षित करण्याचा शिवसेनेचा कट’

पावसाळ्या पूर्वीच्या कामांवरुन शेलार यांनी मुंबई महापालिका आणि शिवसेनेवर जोरदार टीका केलीय. ज्या गोष्टी टाळता येऊ शकतात, नियोजन करता येऊ शकतं. पण महापालिका प्रशासन टाळाटाळ करतंय. नालेसफाई करत नाही. आम्ही नाल्यावर गेलो तेव्हा सत्ताधारी फरार होते. आयुक्तांना नाल्याचे फोटो दिले. मुंबईकरांचा जीव धोक्यात आहे. आमचा दौरा ठरल्यावर आदित्य ठाकरे यांची धावाधाव सुरु झालीय. काल अंधारात पाहणी केली, पण अंधारात पाप घडतं. नियोजन नसल्यामुळे पळापळ करावी लागते. मुंबई असुरक्षित करण्याचा शिवसेनेचा कट आहे. 35 टक्क्यांच्या वर नालेसफाई झालेली नाही, असा दावा शेलार यांनी केलाय.

‘मुंबईकरांचा जीव आणि मालमत्ता दोन्ही असुरक्षित’

पाऊस जवळ आला की हे लोक गार्डन विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत आहेत. मुंबईचा बाप कोण म्हणता, मग मुंबईकडे लक्ष का देत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी एक महिने आढावा घेतला, मग पुढे काय झालं? जे आकडे दिले ते जुगाराचे आहेत, त्याचा वस्तुस्थितीशी काही संबंध नाही. मुंबईकरांचा जीव आणि मालमत्ता दोन्ही असुरक्षित आहे. याचे पाप पालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचे आहे. आम्ही काल दौरा घोषित केला आणि आदित्य ठाकरे काल रात्री गेले. अंधारात पाप होतं, मग आदित्य ठाकरे अंधारात काय करत होते? आज आदित्य ठाकरे पालिकेत आलेत. ही पळापळ का करावी लागते. मुंबईकरांना असुरक्षित करण्यामागे काय कट आहे? वृक्ष छाटणी अजूनही 50 हजाराच्या आसपास राहिली आहे. इतका वेळ काय करत होता? झाडांच्या फांद्यांमुळेही लोकांचे जीव जातात, अशा शब्दात शेलार यांनी महापालिकेवर जोरदार हल्ला चढवला.

‘बाळासाहेब ठाकरे यांनी अशा सत्तेला लाथ मारली असती’

मनसेचे संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना जामीन मंजूर झाला ती न्यायालयीन प्रक्रिया आहे. मात्र हे कुणावरही गुन्हे दाखल करत आहेत. कुणी बोललं, कुणी मोबाईल पाहिला, कुणी मागे वळून पाहिलं नाही तरी गुन्हे दाखल केले जात आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी अशा सत्तेला लाथ मारली असती. राम जन्माला आला की नाही यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यासोबत सत्ता स्थापन करताय, असा टोलाही शेलार यांनी शिवसेनेला लगावलाय.