शरद पवारांसोबत पायऱ्यांवर उभ्या-उभ्या चर्चा, जाता जाता शेलार म्हणाले, मी नंतर फोन करतो!

| Updated on: Mar 11, 2020 | 7:59 PM

भाजपचे नेते आणि माजी मंत्री आशिष शेलार यांची आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Ashish Shelar meets Sharad Pawar) यांची आज भेट झाली.

शरद पवारांसोबत पायऱ्यांवर उभ्या-उभ्या चर्चा, जाता जाता शेलार म्हणाले, मी नंतर फोन करतो!
Follow us on

मुंबई : भाजपचे नेते आणि माजी मंत्री आशिष शेलार यांची आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Ashish Shelar meets Sharad Pawar) यांची आज भेट झाली. विधानभवनच्या पायऱ्यांवर दोघे एकमेकांना भेटले. शरद पवार हे राज्यसभा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विधानभवनात गेले होते. तर अधिवेशनानिमित्त आशिष शेलार विधानभवन परिसरातच होते. (Ashish Shelar meets Sharad Pawar)

यावेळी आशिष शेलार आणि शरद पवारांची विधानभवनाच्या पायऱ्यांवरच चर्चा झाली. दोघांनी एकमेकांशी उभ्या उभ्याच गप्पा मारल्या. दोघांभोवती कार्यकर्ते आणि सुरक्षा रक्षकांचा गराडा होता. दोघांनीही एकमेकांशी हसत-खेळत बातचीत केली. यावेळी पवारांनी आधारासाठी शेलारांचा हात पकडल्याचं दिसलं. तर शेलारही हसत हसत पवारांना काहीतरी सांगत होते.

यादरम्यान गर्दीच्या आवाजामुळे पवारांना शेलारांचं आवाज नीट ऐकू येत नव्हता. शिवाय गर्दीही वाढत होती. त्यामुळे नेमकं कोण-काय बोलतंय हेच समजत नव्हतं. या चर्चेदरम्यान, गर्दी वाढत होती, कोणी पवारांसोबत सेल्फी घेण्यासाठी तर कोणी त्यांना भेटण्यासाठी येत होते. त्यामुळे जाता जाता आशिष शेलारांनी पवारांना ‘मी नंतर फोन करतो’, असं सांगितलं आणि दोघेही पुढे गेले.

राज्यसभा उमेदवारीची धामधूम

राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विधानभवनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांची उपस्थितीत पवारांनी अर्ज भरला. मात्र काँग्रेस चौथ्या जागेसाठी अजूनही आग्रही असल्यामुळे राष्ट्रवादीच्या दुसऱ्या उमेदवार फौजिया खान तूर्तास ‘वेट अँड वॉच’ या भूमिकेत आहेत. (Sharad Pawar Rajyasabha Nomination)

राज्यसभेच्या चौथ्या जागेबाबत समन्वय समितीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. काँग्रेस राज्यसभेतील महाविकास आघाडीच्या चौथ्या जागेसाठी आग्रही असल्यामुळे बैठकीत यावर तोडगा काढण्याची शक्यता आहे. काँग्रेसने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यासोबतच शिवसेनेच्या उमेदवाराचा सस्पेन्सही कायम आहे.

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठी 26 मार्चला निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख शुक्रवार 13 मार्च आहे. संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे चार, तर भाजपचे तीन उमेदवार निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादी दोन तर काँग्रेस-शिवसेना प्रत्येकी एक जागा लढणार असल्याचं बोललं जात होतं.