तोंड बंद करा, अन्यथा मी नावासहित सांगेन… फडणवीसांना कोण अडकवणार होतं? आशिष शेलारांचा इशारा कुणाकडे?

| Updated on: Jan 26, 2023 | 2:29 PM

भाजप सुडाचं राजकारण करतंय, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केलाय. त्याला प्रत्युत्तर देताना आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये काय काय घडलं, याची यादीच वाचून दाखवली.

तोंड बंद करा, अन्यथा मी नावासहित सांगेन... फडणवीसांना कोण अडकवणार होतं? आशिष शेलारांचा इशारा कुणाकडे?
Image Credit source: social media
Follow us on

मुंबईः भाजपावर आरोप करणाऱ्यांनी तोंड बंद करावीत. अन्यथा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना अडकवण्याचा प्रयत्न नेमकं कोण करत होतं, ते मी नावासहित उघड करेन, असा इशारा मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिला आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तसं टार्गेट तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांना देण्यात आलं होतं, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी या आरोपांना दुजोराही दिला आहे. आशिष शेलार यांनीही यावर आज भाष्य केलं.

आशिष शेलार म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला. त्याचा साक्षीदार मी आहे. तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी त्यांच्या खासगी जागेत 250 पानांचा रिपोर्ट ठेवला होता.

त्यानंतर तो सार्वजनिक ठिकाणी आणला. तो रिपोर्ट मी स्वतः वाचला आहे. त्या रिपोर्टमध्ये कोणत्या पानावर देवेंद्र फडणवीस यांचं नाव लिहिण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, हे मी पाहिलं होतं.

दुसऱ्या गोष्टीच्या चौकशीत तिसरी गोष्ट आणण्याचा प्रयत्न तत्कालीन पोलीस आयुक्तांकडून सुरु होता. त्या वेळच्या गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचं राजकारण होतं, असा गंभीर आरोप आशिष शेलार यांनी केलाय…

भाजप सुडाचं राजकारण करतंय, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केलाय. त्याला प्रत्युत्तर देताना आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये काय काय घडलं, याची यादीच वाचून दाखवली. मविआच्या काळा सामान्य नागरिकाचं जाहीर मुंडन केलंत.

आज जितेंद्र आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय, पण त्या वेळी महापौरांनी माझ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. अशी अनेक प्रकरणं केली कुणी? गझनी सिनेमा बघा, म्हणजे तुम्हाला विसरण्याचा आजार होऊ नये, असा खोचक सल्ला आशिष शेलार यांनी सुप्रिया सुळे यांना दिला.

‘सदावर्ते म्हणाले ते खरंच…’

वकील गुणरत्न सदावर्ते यांनीही देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचा कट होता, याबद्दल गंभीर आरोप केलेत. त्यावर आशिष शेलार म्हणाले, स्वतः सदावर्ते म्हणाले ते योग्यच आहे.. एका चौकशीच्या ३०० पानांच्या पेपरमध्ये देवेंद्रजींचं नाव घुसवण्याचा प्रयत्न केला. मी ते पेपर वाचले आणि देवेंद्रजींना सांगितलं. त्या काळातही हे प्रकार चालू होते…
खोटा गुन्हा निर्माण व्हावा, याकरिता प्रयत्न केले गेले. देवेंद्र फडणवीस यांच्यावर येण्याआधी एका व्यक्तीविरोधात त्याच प्रकरणात खोटा गुन्हा दाखल केला. ते प्रकरण कोर्टात आहे, त्यामुळे मी नाव सांगत नाही. आमच्या एका सहकाऱ्यावर त्याच प्रकरणात खोटा गुन्हा दाखल झाला.