नारायण राणे अस्वस्थ, तापलेल्या वातावरणात सत्तेची पोळी भाजण्याचा प्रयत्न : बाळासाहेब थोरात

विरोधीपक्षाने आमचं चुकत असेल तर दाखवून द्यावं, राजकारण करु नये, कोरोना संपला की राजकारण करु, असंही थोरात म्हणाले (Balasaheb Thorat on Narayan Rane)

नारायण राणे अस्वस्थ, तापलेल्या वातावरणात सत्तेची पोळी भाजण्याचा प्रयत्न : बाळासाहेब थोरात
| Updated on: May 26, 2020 | 3:23 PM

मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे अस्वस्थ आहेत. भाजपची सत्ता येईल, मंत्रीपद मिळतील, असं काही जणांना वाटतं. तापलेल्या वातावरणात सत्तेची पोळी भाजणारी ही मंडळी आहेत, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राणेंवर हल्लाबोल चढवला. (Balasaheb Thorat on Narayan Rane)

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती. त्यानंतर पवार माझ्याशीही बोलले. पण नारायण राणे राज्यपालांना का भेटले हे काही माहीत नाही, असं थोरात म्हणाले. राणे सध्या अस्वस्थ आहेत. काही मंडळींना भाजपची सत्ता येईल, मंत्रीपद मिळतील, असं वाटतं, त्यामुळे ‘कोरोना’च्या काळात तापलेल्या वातावरणात सत्तेची पोळी भाजण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत, असा टोलाही थोरातांनी नारायण राणेंना लगावला.

हेही वाचा : “नारायण राणेंचं शिवसेनेशी जुनं नातं, सेनेनं त्यांना मोठं केलं आणि सेनेनंच रस्त्यावर आणलं”

महाविकास आघाडीचं लक्ष आता ‘कोरोना’च्या संकटातून जनतेला कसे बाहेर काढावे याकडे आहे. तिन्ही पक्षांचे नेते, मंत्री हे कोरोना कसा रोखता येईल, हे बघत आहेत. बाकी दुसरी चर्चासुद्धा नाही, असा दावा बाळासाहेब थोरात यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना केला.

शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झाली. पवारसाहेब आमच्या आघाडीचे नेते आहेत. ते भेट घेऊ शकतात, त्यामागे वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. आमचं सरकार स्थिर आहे, फक्त वातावरण निर्माण केलं जातं आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

हेही वाचा : राणेंची राष्ट्रपती राजवटीची मागणी ही भाजपची अधिकृत भूमिका नाही : सुधीर मुनगंटीवार

विरोधीपक्षाने आमचं चुकत असेल तर दाखवून द्यावं, राजकारण करु नये, कोरोना संपला की राजकारण करु. त्यासाठी भरपूर वेळ आहे. पण राष्ट्रपती राजवट हा मुद्दा पुढे आणू नये, आता आम्हाला काम करु द्या, असं आवाहनही थोरातांनी केलं.