Pankaja Munde | भाजपमध्ये पंकजा मुंडेंची उपेक्षा होतेय का? गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनी मामा प्रकाश महाजन यांनी व्यक्त केल्या भावना

| Updated on: Jun 03, 2022 | 2:22 PM

'पंकजा मुंडे यांचं राजकीय महत्व हे मेघना बोर्डीकर, मोनिका राजळे यांना विचारलं पाहिजे. पंकजा मुंडे महाराष्ट्रात मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या नेत्या आहेत, त्यांची उपयुक्तता भाजपच्या लक्षात आली पाहिजे.' असं वक्तव्य प्रकाश महाजन यांनी केलंय

Pankaja Munde | भाजपमध्ये पंकजा मुंडेंची उपेक्षा होतेय का? गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनी मामा प्रकाश महाजन यांनी व्यक्त केल्या भावना
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बीडः अनेकदा दुखावल्या, नाराज झाल्या तरीही पंकजा मुंडे भाजपसाठी सदैव उभ्या असतात. जनाधार वाढवतात. लोकांच्या संपर्कात असतात. पक्षाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडतात. पण भाजपच्या नेतृत्वाकडून मात्र पंकजा मुंडेंची (Pankaja Munde) उपेक्षा होतेय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असते. गेल्या काही दिवसातील राज्यातील राजकारणातील पंकजांची अनुपस्थिती तर एकदम बोलकी आहे. पंकजांनी यावर उघड भाष्य केलेलं नसलं तरीही अनेक कार्यक्रमांतून चित्र स्पष्ट होतंय. याविषय़ी पंकजा मुंडे यांचे मामा आणि मनसे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी नेमक्या शब्दात उत्तर दिलं. लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा आठवा स्मृतीदिन आज गोपीनाथ गडावर आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध राजकीय नेते आज बीडमध्ये उपस्थित आहेत. दुपारी तीन वाजता स्मृतीदिनाच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल. गोपीनाथ गडावर आज मराठवाड्यातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली आहे. यात प्रीतम मुंडे, धनंजय मुंडे तसेच गोपीनाथ मुंडे यांचे मेहुणे प्रकाश महाजन यांनीही उपस्थिती दर्शवली. यावेळी भाची पंकजा मुंडेंच्या राजकीय स्थितीविषयी त्यांनी भाष्य केलं.

पंकजांविषयी प्रकाश महाजन म्हणाले…

भाजपमध्ये पंकजा मुंडे यांची उपेक्षा होतेय का, यावर बोलताना प्रकाश महाजन म्हणाले, ‘पंकजा मुंडे यांची उपेक्षा होतेय का यावर मी बोलणार नाही मात्र भाजपने याचा विचार केला पाहिजे. पंकजा मुंडे जरी पराभूत झाल्या तरी त्यांच्यामुळे अनेक जागा निवडून आल्या हे विसरता येणार नाही. पंकजा मुंडे यांचं राजकीय महत्व हे मेघना बोर्डीकर, मोनिका राजळे यांना विचारलं पाहिजे. पंकजा मुंडे महाराष्ट्रात मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या नेत्या आहेत, त्यांची उपयुक्तता भाजपच्या लक्षात आली पाहिजे.’

हे सुद्धा वाचा

‘माणसातून देव झालेले व्यक्ती म्हणजे गोपीनाथ मुंडे’

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी जाग्या करताना प्रकाश महाजन म्हणाले, ‘ गोपीनाथ मुंडे हे माणसातून देव झालेले व्यक्ती होते. देवाला कधी माणूस होऊन पृथ्वीवर जन्म घेतल्याच्या गोष्टी आपण ऐकल्या असतील पण गोपीनाथ मुंडे माणूस म्हणून जन्माला आले आणि देवपण जगले. कारण आज गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीला लोक पत्रिका ठेवतात. लग्न झाल्यानंतर दर्शनाला येतात. साधी ताप आली तर लोक इथे येऊन नवस बोलतात.’

मुंडेंच्या कौटुंबिक आठवणी…

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पत्नी प्रज्ञाताई या प्रकाश महाजन यांच्या बहीण आहेत. प्रकाश महाजन यांचे मोठे बंधू प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचं संख्य आणि राजकीय महत्त्व अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे. प्रज्ञाताई आणि गोपीनाथ मुंडे यांचं लग्नही आंतरजातीय होतं. याविषयी बोलताना प्रकाश महाजन म्हणाले, ‘ गोपीनाथ मुंडे आणि प्रज्ञा ताई यांचं लग्न झालं त्याला कुणीही विरोध केला नाही. अंबेजोगाईत योगेश्वरी महाविद्यालयाच्या मैदानात झालं आणि त्यावेळचे ते सर्वात मोठे लग्न होते. दोन हजार लोक त्या लग्नाला आले होते. गोपीनाथ मुंडे यांच्या घरच्यांनीसुद्धा हे लग्न स्वीकारलं होतं. पंडित अण्णा मुंडेसुद्धा या लग्नाच्या पाठीशी उभे राहिले होते. त्यामुळे या लग्नाच्या काही अडचणी आल्या नाहीत, अशी आठवण प्रकाश महाजन यांनी सांगितली.