मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) आणि ठाकरे सरकारमधील (Thackeray Government) वाद संपण्याचं नाव घेत नाहीत. अर्थसंकल्पीय विधानसभा अध्यक्षांच्या निवडणूक घेण्याची मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली होती. मात्र, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असल्यामुळे कोश्यारी यांनी ठाकरे सरकारचा प्रस्ताव फेटाळून लावला. त्यानंतर आज पुन्हा एकदा कोश्यारी यांनी ठाकरे सरकारवर कुरघोडी केल्याचं पाहायला मिळतंय. अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील जळीतकांड प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा (Dr. Sunil Pokharna) यांचं राज्य सरकारकडून निलंबन करण्यात आलं होतं. मात्र, राज्यपाल कोश्यारी यांनी पोखरणा यांचं निलंबन रद्द केलं आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आफल्या विशेषाधिकाराचा वापर करत डॉ. सुनील पोखरणा यांचं निलंबन रद्द केलं आहे. इतकंच नाही तर पुणे जिल्ह्यातील शिरुरच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आलीय. त्यामुळे कोश्यारी यांनी एकप्रकारे पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर कुरघोडी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. दरम्यान, अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी समिती स्थापन करुन त्याचा अहवाल सरकारकडे पाठवण्यात आला होता. या अहवालात सुनील पोखरणा दोषी असल्याचे सिद्ध झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयात 6 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी भीषण आग लागली होती. या आगीत घटनेच्या दिवशी 14 कोरोनाबधित रुग्णांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला होता. शॉर्टसर्किटमुळे सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास जिल्हा रुग्णालयातील ICU विभागाला आग लागली. या ICU विभागात एकूण 17 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी जाऊन ही आग आटोक्यात आणली. मात्र या आगीत 11 रुग्णांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. तर अन्य 6 रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
इतर बातम्या :