विखेंचा मोठा पेच सुटला, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत कट्टर विरोधकाचं मनोमिलन

| Updated on: Oct 09, 2019 | 5:59 PM

व्यासपीठावर एका बाजूला राधाकृष्ण विखे पाटील आणि दुसऱ्या बाजूला भानुदास मुरकुटे (Bhanudas Murkute Radhakrishna Vikhe) बसले होते. नेहमी एकमेकांवर टीका करणाऱ्या या नेत्यांच्या भाषणालाही उपस्थितांनी शिट्ट्या आणि टाळ्या वाजवून दाद दिली.

विखेंचा मोठा पेच सुटला, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत कट्टर विरोधकाचं मनोमिलन
Follow us on

अहमदनगर : भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचं कट्टर विरोधक राष्ट्रवादीचे माजी आमदार भानुदास मुरकुटे (Bhanudas Murkute Radhakrishna Vikhe) यांच्यासोबत मनोमिलन झालं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत श्रीरामपूर मतदारसंघातील हा मोठा पेच सोडवण्यात आला. व्यासपीठावर एका बाजूला राधाकृष्ण विखे पाटील आणि दुसऱ्या बाजूला भानुदास मुरकुटे (Bhanudas Murkute Radhakrishna Vikhe) बसले होते. नेहमी एकमेकांवर टीका करणाऱ्या या नेत्यांच्या भाषणालाही उपस्थितांनी शिट्ट्या आणि टाळ्या वाजवून दाद दिली.

भानुदास मुरकुटे हे सध्या कोणत्याही पक्षात नाहीत. स्थानिक आघाडीच्या माध्यमातून ते राजकारणात आहेत. पण त्यांनी 2004 ला दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटलांविरोधात कोपरगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यात मुरकुटेंचा पराभव झाला होता. विखे कुटुंबासोबत मुरकुटे यांचा विरोध जुना आहे. पण उद्धव यांनी विखे आणि मुरकुटेंचा हातात हात देऊन मनोमिलन घडवून आणलं.

उपस्थितांसाठी हा प्रसंग आगळावेगळा होता. यानंतर बराच वेळ हास्यविनोद दिसून आला. तर उपस्थितांनीही याला शिट्टया आणि टाळ्या वाजवून दाद दिली. मुरकुटे यांनी आपल्या भाषणातही त्याचा उल्लेख केला. विखे आणि माझी मैत्री कधी-कधी तुटते, असा चिमटाही त्यांनी काढला. राधाकृष्ण विखे पाटलांनी आता गडबड केली तर खासदार सुजय विखे पाहून घेतील, कारण त्यांचं-आमचं ठरलंय, अशा विनोदी शैलीत मुरकुटे यांनी विखेंसोबत येण्याची भूमिका स्पष्ट केली.

उद्धव ठाकरेंकडून मुस्लीम मतदारांना साद

हिंदुत्वाचा अंगीकार आणि प्रचार-प्रसार करणाऱ्या शिवेसेनेने या निवडणुकीत मुस्लिमांनाही भावनिक साद घातली आहे. मुस्लीम हे आमचे भाऊच आहेत. जे देशाबद्दल प्रेम बाळगतात ते मुस्लीम आपलेच आहेत. आपल्या प्रचार व्यासपीठावरही मुस्लीम नेते दिसत आहेत. हे केवळ निवडणुका आहेत म्हणून बोलत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

श्रीरामपूर येथील शिवसेना उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारसभेत बोलताना ठाकरेंनी मुस्लीम समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न केला. श्रीरामपूर हा अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघ आहे. या मतदारसंघात मुस्लिमांची मते निर्णायक असल्याने त्यांनी मुस्लिांनाही आपलंसं करण्याचा प्रयत्न केला.

बाळासाहेब थोरातांवरही टीका

उद्धव ठाकरेंनी विधानसभेच्या निवडणूक प्रचारासाठी अहमदनगर जिल्हयात झंजावाती सभा घेतल्या. संगमेनरपासून त्यांनी शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ करत धुरळा उडवला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांवर कडाडून टीका करताना उद्धव ठाकरे यांनी संबंधित विधानसभेतील नेत्यांनाही लक्ष्य केलं. ज्यांचे नेते बँकॉकला आहेत, त्या शिपुरड्यांनी लढण्याची भाषा करु नये, अशा शब्दात उद्धव यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांवर निशाणा साधला.