जळगावात भाजपला पुन्हा हादरा, दिग्गज नेत्या अस्मिता पाटील यांची सोडचिठ्ठी

| Updated on: Dec 25, 2020 | 11:57 AM

अस्मिता पाटील जळगाव भाजपच्या ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षा आणि बेटी बचाव बेटी पढावच्या राज्य सदस्या होत्या

जळगावात भाजपला पुन्हा हादरा, दिग्गज नेत्या अस्मिता पाटील यांची सोडचिठ्ठी
Follow us on

जळगाव : उत्तर महाराष्ट्रातील दिग्गज नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपला हादरा देत राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला. त्यानंतर खानदेशात भाजपला गळती लागल्याचं चित्र आहे. भारतीय जनता पक्षाच्या जळगाव ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षा अस्मिता पाटील (Asmita Patil) यांनीही भाजपला सोडचिठ्ठी दिली. आता खडसेंपाठोपाठ त्या घड्याळ हाती बांधणार, म्हणजेच घरवापसी करणार, की शिवबंधनात बांधल्या जाणार, याची उत्सुकता वाढली आहे. (BJP Jalgaon Leader Asmita Patil resigns likely to join NCP)

प्रा. डॉ. अस्मिता पाटील या जळगाव भाजपच्या ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षा आणि बेटी बचाव बेटी पढाव अभियानाच्या राज्य सदस्या होत्या. त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत आपल्या पदाचा राजनामा दिल्याची माहिती ‘टीव्ही 9 मराठी’ला दिली. ‘मी अस्मिता नित्यानंद पाटील वैयक्तिक कारणास्तव भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे’ असे पत्र अस्मिता पाटील यांनी जळगाव ग्रामीण जिल्हा अध्यक्ष सुरेश भोळे यांना लिहिले आहे.

अस्मिता पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी राष्ट्रवादीसोबत काही वर्ष काम केलं आहे. नुकतंच राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी अन्य पक्षात गेलेल्या नेत्यांना घरवापसीची साद घातली होती, तिला प्रतिसाद देत अस्मिता पाटील राष्ट्रवादीत स्वगृही परतणार का हा सवाल उपस्थित केला जात आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम केल्यावर भाजपची खानदेशातील गळती वाढली आहे. त्यामुळे खडसेंच्या पावलावर त्या पाऊल टाकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दुसरीकडे, अस्मिता पाटील यांच्यासमोर शिवसेनेचाही पर्याय उपलब्ध असल्याची पाचोरा तालुक्यात जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे त्या हाती घड्याळ बांधणार की शिवबंधन, याची उत्सुकता आहे.

भाजप सोडून परत या, अजित पवारांची साद

एकीकडे जयंत पाटलांनी मेगाभरतीची घोषणा केली, तर दुसरीकडे अजित पवारांनीही थेट नेत्यांना साद घालून, राष्ट्रवादीत परत येण्याचं आवाहन केलं. इतकंच नाही तर जे कुणी भाजपचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीत येतील त्यांच्या विरोधात भाजप साहजिकच उमेदवार देईल. पण आम्ही तीनही पक्ष मिळून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करु, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

अजित पवार, जयंत पाटील यांच्या या आवाहनानंतर आता राष्ट्रवादीतून गेलेले दिग्गज नेते आता कोणता निर्णय घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (BJP Jalgaon Leader Asmita Patil resigns likely to join NCP)

राष्ट्रवादीची मेगाभरती

“भाजपमध्ये दहापेक्षा जास्त आमदार नाराज असून, राष्ट्रवादीत लवकरच मेगाभरती होणार आहे”, असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला होता. जयंत पाटील यांनी हे विधान करुन राष्ट्रवादी सोडून गेलेल्यांसाठी आपली दारं पुन्हा उघडी असल्याचं त्यांनी दाखवून दिलं आहे.

“गेले काही दिवस अनेक सदस्य चर्चा करत आहे. हाताच्या दोन्ही बोटांपेक्षा जास्त सदस्य भाजपमध्ये नाराज आहेत, त्यांना तिथे उबग आलेली आहे, त्यांच्यातील बऱ्याच जणांचा राष्ट्रवादीकडे येण्याचा कल आहे, लवकर निर्णय घेतला जाईल”, असं जयंत पाटलांनी म्हटलं.

संबंधित बातम्या :

राष्ट्रवादीकडून घरवापसीची साद, गणेश नाईक भाजप सोडणार?

नाशिकमध्ये बाळासाहेब सानपांची घरवापसी, भाजपला किती फायदा? किती तोटा?

(BJP Jalgaon Leader Asmita Patil resigns likely to join NCP)