यवतमाळ विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपचा तगडा उमेदवार, शिवसेनेला मोठा फटका?

| Updated on: Jan 13, 2020 | 7:59 PM

राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज संस्था आणि विधानपरिषदेच्या निवडणुकांचीही रणधुमाळी सुरु आहे (Yawatmal Council Election ). यवतमाळ विधानपरिषद निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेत चांगलीच चूरस सुरु आहे.

यवतमाळ विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपचा तगडा उमेदवार, शिवसेनेला मोठा फटका?
Follow us on

यवतमाळ : राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज संस्था आणि विधानपरिषदेच्या निवडणुकांचीही रणधुमाळी सुरु आहे (Yavatmal Council Election ). यवतमाळ विधानपरिषद निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेत चांगलीच चूरस सुरु आहे. भाजपनं शिवसेनेला टक्कर देण्यासाठी तगडा उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीसाठी सध्या भाजपकडून माजी आमदार मितेश भांगडीया आणि शिवसेनेचे प्रवक्ते किशोर कन्हेरे यांच्या नावाची चर्चा आहे. कन्हेरे भाजपच्या गोटात गेल्यास शिवसेनेसाठी हा मोठा फटका असणार आहे (Yavatmal Council Election).

किशोर कन्हेरे विदर्भातील शिवसेनेचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यामुळे भाजपनं यवतमाळ विधानपरिषदेसाठी कन्हेरेंना उमेदवारी दिल्यास शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेनेकडून भाजपला शह देण्यासाठी दुष्यंत चतुर्वेदी यांना निवडणूक रिंगणात उतरवले जाणार आहे. दुष्यंत चतुर्वेदी महाविकासआघाडीचे संयुक्त उमेदवार असतील. चतुर्वेदी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करायला स्वतः कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊत, शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर येणार असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे शिवसेनेने ही लढाई प्रतिष्ठेची केल्याचं दिसत आहे.

महाविकासआघाडीने आपला उमेदवार घोषित केला असला तरी भाजपने मात्र अद्याप आपला उमेदवार घोषित केलेला नाही. नागपूरचे किशोर कन्हेरे आणि यवतमाळचे सुमित बाजोरिया या दोन नावांवरच भाजपमध्ये चर्चा सुरु आहे. हे दोन्ही उमेदवार मंगळवारी (14 जानेवारी) भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, यवतमाळ विधान परिषद निवडणुकीसाठी सुरुवातीला दुष्यंत चतुर्वेदींसह 3 नावं चर्चेत होती. याबाबत पालकमंत्री संजय राठोड यांनी स्वतः यवतमाळ जिल्हा प्रमुखांसोबत बैठक घेतली. यात या नावांवर चर्चा झाली आणि ही तीन नावं उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात आली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दुष्यंत चतुर्वेदी यांचं नाव निश्चित केलं.

यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीमध्ये याआधी तानाजी सावंत यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, तानाजी सावंत एकदाही यवतमाळला फिरकले नाही असा आरोप करत त्यांच्या नावाला जोरदार विरोध झाला. त्यामुळे यावेळी पुन्हा बाहेरचा उमेदवार नको, अशी मागणी झाली होती.