गणेश नाईकांच्या भाजप प्रवेशापूर्वीच आमदार मंदा म्हात्रे नाराज

| Updated on: Jul 29, 2019 | 6:45 PM

बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी (BJP MLA Manda mhatre) गणेश नाईकांच्या भाजपात येण्यावर टीका केली आहे. गणेश नाईक हे त्यांचं साम्राज्य वाचवण्यासाठी भाजपात येत असल्याचं मंदा म्हात्रे (BJP MLA Manda mhatre) यांनी म्हटलंय.

गणेश नाईकांच्या भाजप प्रवेशापूर्वीच आमदार मंदा म्हात्रे नाराज
Follow us on

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईतील दिग्गज नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांचा त्यांचा आमदार मुलगा आणि 57 नगरसेवकांसह भाजप प्रवेश निश्चित झालाय. पण त्यापूर्वीच भाजपात नाराजी पाहायला मिळत आहे. बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी (BJP MLA Manda mhatre) गणेश नाईकांच्या भाजपात येण्यावर टीका केली आहे. गणेश नाईक हे त्यांचं साम्राज्य वाचवण्यासाठी भाजपात येत असल्याचं मंदा म्हात्रे (BJP MLA Manda mhatre) यांनी म्हटलंय.

नाईक आपले साम्राज्य वाचविण्यासाठी भाजपात येत आहेत. त्यांना भाजपबद्दल आपुलकी नाही. बेलापूरमधून पुन्हा एकदा मलाच उमेदवारी मिळेल. पक्षश्रेष्ठी मला न्याय देतील. ही गणेश नाईक यांची स्टंटबाजी आहे, अशी प्रतिक्रिया मंदा म्हात्रे यांनी दिली. त्यामुळे स्थानिक भाजपमधील धुसफूस या निमित्ताने समोर येऊ लागली आहे.

गणेश नाईकांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित

नवी मुंबई महापालिकेतील 57 नगरसेवक, आमदार संदीप नाईक यांच्यासह गणेश नाईक बुधवारी सकाळी साडे 11 वाजता भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. यासोबतच नवी मुंबई महापालिकेत भाजपची सत्ताही येणार आहे. या महापालिकेत भाजपचे फक्त सहा नगरसेवक आहेत. पण या 57 नगरसेवकांसह भाजपची सत्ता येईल. नगरसेवकांनी भाजप प्रवेशाबाबत बैठक झाली आणि यानंतर एकमताने पक्ष सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

गणेश नाईक नवी मुंबईतील सर्वात मोठा चेहरा

गणेश नाईक हा राष्ट्रवादीचा नवी मुंबई आणि ठाणे या भागातील सर्वात मोठा चेहरा आहे. 17  डिसेंबर 1992 रोजी नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाली. तेव्हापासून नवी मुंबई महापालिकेवर गणेश नाईक यांची एकहाती सत्ता आहे, असं म्हटलं तर वावगं ठरु नये. गणेश नाईक हे आधी शिवसेनेत होते. 1990 ला ते पहिल्यांदा नवी मुंबईतून आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 25 मे 1999 रोजी शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करण्यात आली. तेव्हा गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर राज्यातील सत्तेची समीकरणं कितीही बदलली तरी नवी मुंबईत मात्र राष्ट्रवादीचीच सत्ता राहिली.

2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदी लाटेमुळे गणेश नाईक यांना पराभव स्वीकारावा लागला. ते भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्याकडून पराभूत झाले. राष्ट्रवादीच्या काळात गणेश नाईक यांनी अनेक महत्त्वाची पदं सांभळली. ते ठाण्याचे पालकमंत्री होते. तसेच, ते कामगार, उत्पादन शुल्क आणि पर्यावरण मंत्रीही होते. गणेश नाईक यांचा मुलगा संदीप नाईक हे सध्या नवी मुंबईतील ऐरोलीचे आमदार आहेत.