अत्याचारी मुघल बादशाहांचं कौतुक करणारं वक्तव्य कबीर खानने मागे घ्यावं, राम कदम आक्रमक
अत्याचारी मुघल बादशाहाबद्दल कौतुकाने केलेले विधान दिग्दर्शक कबीर खान यांनी त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे. त्यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर केला आहे.
मुंबई : अत्याचारी मुघल बादशाहाबद्दल कौतुकाने केलेले विधान दिग्दर्शक कबीर खान (Kabir Khan) यांनी त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी केली आहे. “मुघलांची राक्षसी प्रतिमा दाखवणारे चित्रपट पाहणं ‘प्रॉब्लेमॅटिक आणि त्रासदायक’ वाटतं. कारण ते ‘ऐतिहासिक पुराव्यांवर’ आधारित नाहीत” असं मत कबीर खान यांनी व्यक्त केलं होतं. तसंच, अत्याचारी मुघल बादशहाचे कौतुक करणाऱ्या ‘द एम्पायर’ या वेब सिरीजवर त्वरित बंदी घालायला हवी, अशी मागणीही राम कदम यांनी उचलून धरली आहे.
काय म्हणाले राम कदम?
‘द एम्पायर’ (The Empire) नावाची वेब सीरीज हॉटस्टार (hotstar) वर येत आहे. ज्या मुघल बादशाहांनी आपल्या देशावर आक्रमण केलं. रक्तपात करत लूटमार केली, लोकांवर अनन्वित अत्याचार करत छळ केले. मंदिरं तोडली, धर्मशाळांचा विद्ध्वंस केला, त्या मुघलांचा जयजयकार आणि प्रशंसा या वेब सीरीजमध्ये केली आहे. बाबरपासून औरंगजेबापर्यंत जे मुघल बादशाह भारतात येऊन लूट करतात, त्यांचं कौतुक या भूमीत कसं होऊ शकतं? आमचा या वेब सीरीजला विरोध आहे. याच्यावर कायमची बंदी घालायला हवी, अशी मागणी राम कदमांनी ट्विटरवरुन केली आहे.
“कबीर खान यांनी विधान मागे घ्यावं”
दुसरीकडे, दिग्दर्शक कबीर खान म्हणतात की या आक्रमणकारी मुघल बादशाहांचा भारताच्या निर्मितीत, देशहितामध्ये फार मोठा वाटा आहे. ज्या लोकांनी भारतात लूट केली, त्यांचा भारताच्या निर्मितीत वाटा? हे विधान न पटणारं आहे. कोणाला चित्रपट-मालिका बनवायची असेल, तर आमच्या शिवरायांवर बनवा, राणी लक्ष्मीबाई, महाराणा प्रतापसिंग यांच्यावर बनवा. पण अशा प्रकारचं विधान आम्हाला मान्य नाही. अत्याचारी मुघल बादशाहाबद्दल कौतुकाने केलेले विधान त्वरित मागे घ्यावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे. राम कदम यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर केला आहे.
पाहा व्हिडीओ :
#TheEmpire नावाच्या वेबसिरीज #hotstar वर येत आहे. जे अत्याचारी मुघल बादशहाचे कौतुक करणारी आहे, या वेबसिरीजवर त्वरित बंदी घालायला हवी!
आणि दिग्दर्शक कबीर खानने अत्याचारी मुगलबादशाह बद्दल कौतुकाने केलेले विधान त्वरित मागे घ्यावे! – राम कदम pic.twitter.com/gtR9f8cn1C
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) August 27, 2021
कबीर खान नेमकं काय म्हणाले?
“मुघलांची राक्षसी प्रतिमा दाखवणं मला खूपच प्रॉब्लेमॅटिक आणि क्लेशदायी वाटतं. मला खरोखर कुठली गोष्ट अस्वस्थ करत असेल, तर ती म्हणजे केवळ लोकप्रिय कथानकानुसार जाण्यासाठी तशा प्रकारची सिने निर्मिती केली जाणं. जेव्हा एखाद्या चित्रपट निर्मात्याने कुठल्या गोष्टीवर संशोधन केले असते आणि चित्रपट निर्मात्याला एखादा मुद्दा मांडायचा असतो, तेव्हा मी समजू शकतो. नक्कीच, वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात. पण जर तुम्हाला मुघलांना राक्षसी स्वरुपात दाखवायचे असेल, तर कृपया ते संशोधनावर आधारित दाखवा आणि तुम्हाला ते खलनायक का वाटले, हे आम्हाला समजावून सांगा” असं आवाहन कबीर खान यांनी निर्माते-दिग्दर्शकांना केलं.
“जेव्हा तुम्ही थोडंफार संशोधन केलं असतं आणि इतिहास वाचला असतो, तेव्हा मुघलांना खलनायक का ठरवलं गेलं, हे समजणं खूप कठीण जातं. मला तर वाटतं की ते मूळ राष्ट्रनिर्माते होते, पण त्या मुद्द्याला बगल देण्यासाठी त्यांनी लोकांचे खून केले, असं म्हटलं गेलं. पण तुम्ही कशाचा आधार घेत आहात? कृपया ऐतिहासिक पुरावे द्या. कृपया खुली चर्चा करा, फक्त तुम्हाला लोकप्रिय वाटेल अशा कथेसोबत जाऊ नका” असंही कबीर खान म्हणाले.
“मी त्या चित्रपटांचा आदर करु शकत नाही”
“भारताच्या इतिहासात वेगवेगळ्या टप्प्यांवर असलेल्या मुघल आणि इतर विविध मुस्लिम शासकांचे राक्षसीकरण करणे ही आज सर्वात सोपी गोष्ट आहे. त्यांना पूर्वग्रहदूषित रुढींमध्ये बसवण्याचा प्रयत्न करणे दुःखदायक आहे. दुर्दैवाने मी त्या चित्रपटांचा आदर करु शकत नाही. हे माझे वैयक्तिक मत आहे, नक्कीच, मी प्रेक्षकांबद्दल बोलू शकत नाही, परंतु अशा प्रकारच्या चित्रणांमुळे मी नक्कीच अस्वस्थ होतो.” असंही कबीर खान यांनी स्पष्ट केलं.
ऐतिहासिक चित्रपटांवरुन वाद
ऐतिहासिक चित्रपटांवरुन झालेले वाद बॉलिवूडसाठी नवीन नाहीत. नजीकच्या वर्षांत, पद्मावत, पानिपत आणि तान्हाजी यासारख्या चित्रपटांतील ऐतिहासिक तथ्य संशयाच्या भोवऱ्यात सापडली होती. अभिनेता सैफ अली खान, ज्याने तान्हाजीमध्ये उदयभान राठोडची भूमिका केली होती, त्यानेही सिनेमात ऐतिहासिक तथ्य चुकीच्या पद्धतीने मांडली गेल्याचा दावा केला होता.
संबंधित बातम्या :