भाजप-सेना एकत्र येतील, राष्ट्रवादीचे 9 आमदार संपर्कात, उदयनराजेंना राज्यसभेवर पाठवण्याचा विचार : खासदार निंबाळकर

| Updated on: Nov 14, 2019 | 1:57 PM

राज्यातील सत्ता स्थापनेचा वाद दिवसेंदिवस चिघळत असताना, यात आता माढ्याचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी (Ranjeetsinha Naik Nimbalkar) उडी घेतली.

भाजप-सेना एकत्र येतील, राष्ट्रवादीचे 9 आमदार संपर्कात, उदयनराजेंना राज्यसभेवर पाठवण्याचा विचार : खासदार निंबाळकर
Follow us on

सोलापूर : राज्यातील सत्ता स्थापनेचा वाद दिवसेंदिवस चिघळत असताना, यात आता माढ्याचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी (Ranjeetsinha Naik Nimbalkar) उडी घेतली. राष्ट्रवादीचे नऊ आमदार संपर्कात असल्याचा दावा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी (Ranjeetsinha Naik Nimbalkar)  केला आहे. अनावधानाने जनमताचा अनादर झाल्याचा सांगत त्याला भाजप जबाबाबदार नाही, असंही खासदार निंबाळकर म्हणाले.

खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी माढा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुबड्यावर सरकार टिकणार नाही याची जाणीव उद्धव ठाकरे यांना आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये तात्विक वाद आहे, तो लवकरच मिटेल असंही नाईक निंबाळकर म्हणाले.

भाजप-शिवसेना एकत्र येतील

आम्हाला आजही उद्धव ठाकरे आणि शिवसेनेबद्दल आदर आहे. आम्ही आजही टोकाची विधाने केलेली नाहीत. मला खात्री आहे, भाजप-शिवसेना एकत्र येईल. भाजप मोठ्या भावाची भूमिका पार पडेल, असं विश्वास निंबाळकरांनी व्यक्त केला.

घरामध्ये भांडणं होत असतात, जिवंतपणाचं लक्षण आहे. भावाभावांत वाद होत असतो, तो कायमस्वरुपीचा  नसतो. पुढे हा वाद मिटेल याची खात्री आहे. उद्धव ठाकरे हे समजूतदार आहेत, जो कलह निर्माण झाला आहे, तो दूर होईल. दोन्ही पक्षांची युती 25 वर्षापासून आहे, त्यामुळे ते पुन्हा एकत्र येतील.

उदयनराजेंच्या पुनर्वसनाचे प्रयत्न

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभूत झालेले उदयनराजे भोसले यांच्या राजकीय पुनर्वसनाचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांना राज्यात महत्वाचे पद किंवा राज्यसभेववर संधी देण्याचं विचाराधीन आहे, असं नाईक निंबाळकरांनी सांगितलं. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत भावनिक मुद्यामुळे शरद पवार यशस्वी झाल्याचं निंबाळकर म्हणाले.

राष्ट्रवादीला उमेदवार मिळणार नाही

पुन्हा निवडणुकीचा राष्ट्रवादीचा डाव आहे. पण जर निवडणुका लागल्या तर राष्ट्रवादीला पुन्हा उमेदवार मिळणार नाही. भाजपला 105 जागांवर विजय मिळाला. भाजपचा स्ट्राईक रेट मोठा आहे. शरद पवारांना कधीही इतकं मोठं यश मिळालं नाही. शरद पवारांचा पक्ष आजही तिसऱ्या स्थानावर आहे. असं निंबाळकरांनी सांगितलं.