नवी मुंबईवर पुन्हा सत्ता आणण्यासाठी पायाभरणी, देवेंद्र फडणवीस आक्रमक

| Updated on: Feb 16, 2020 | 10:48 AM

महाआघाडी सरकार कसं चुकीचं आहे, हे दाखवणारे बॅनर भाजपच्या नवी मुंबईतील अधिवेशनस्थळी लावण्यात आले आहेत.

नवी मुंबईवर पुन्हा सत्ता आणण्यासाठी पायाभरणी, देवेंद्र फडणवीस आक्रमक
Follow us on

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा आपली सत्ता येण्यासाठी पायाभरणी करुया, असं म्हणत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना बळ दिलं. नवी मुंबईत सुरु असलेल्या भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशनात (BJP Navi Mumbai Adhiveshan) फडणवीस बोलत होते.

भाजप हा एका ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार असणारा पक्ष आहे. पक्ष ही निरंतर चालणारी गोष्ट आहे. आज सर्व आजी-माजी अध्यक्षांचा सत्कार केला. सामान्य कार्यकर्तांचा निधी घेऊन आपण उत्तम वास्तू तयार करु. नवी मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा आपली सत्ता येण्यासाठी पायाभरणी करुया, असं फडणवीस भाजप कार्यालयाच्या पायाभरणीवेळी म्हणाले.

भाजपच्या दोन दिवसीय अधिवेशनाचा आज समारोप होणार आहे. महाआघाडी सरकार कसं चुकीचं आहे, हे दाखवणारे बॅनर अधिवेशनस्थळी लावण्यात आले आहेत. विश्वासघात करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, असं बॅनरवर लिहिलं असून त्यावर देवेंद्र फडणवीसांचाही फोटो लावण्यात आला आहे.

भाजपच्या राज्यव्यापी अधिवेशनाला पक्षाचे महाराष्ट्रातील खासदार, आमदार, महापौर, नगरसेवक सहभागी झाले आहेत. शिवसेना-भाजपला जनमत मिळाल्यानंतरही सेनेने आपली भूमिका बदलली, त्यामुळे भाजपची पुढची भूमिका काय असेल याबाबत या अधिवेशनात विचारमंथन होत आहे.

महाविकास आघाडी सरकारने जनतेला 80 दिवसांत कसं मूर्ख बनवलं, यावर प्रस्ताव सादर केला जाईल. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनआरसी आणि सीएए कायद्याबाबत निर्णय घेतल्यामुळे त्यांच्या अभिनदंनाचा प्रस्तावही यावेळी सादर करण्यात येईल, अशी माहिती भाजप नेते विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत (BJP Navi Mumbai Adhiveshan) दिली होती.