अशोक चव्हाण पुन्हा एकदा भाजपच्या चक्रव्युहात अडकले?

| Updated on: Oct 07, 2019 | 4:41 PM

एकट्या नांदेड जिल्ह्यात विधानसभेच्या नऊ जागा असून त्यासाठी चव्हाण वेळ देऊ शकले नाही तर काँग्रेसचा हा बालेकिल्ला कायम राखणं अवघड काम आहे. त्यातच नांदेडच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडीच्या रुपाने एक नवीन शत्रू काँग्रेससाठी तयार झाल्याने या वेळेला चव्हाण यांना जास्त मेहनत घ्यावी लागत आहे.

अशोक चव्हाण पुन्हा एकदा भाजपच्या चक्रव्युहात अडकले?
Follow us on

नांदेड : काँग्रेसचे राज्यातील महत्त्वाचे नेते अशोक चव्हाण (Ashok chavan bhokar) सध्या नांदेडमध्ये तळ ठोकून आहेत. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर चव्हाण (Ashok chavan bhokar) विधानसभेच्या निवडणुकीला उभे राहणार आहेत. भोकर या पारंपरिक मतदारसंघातून ते निवडणुकीला उभे राहतील असा अंदाज आहे. मात्र अशोक चव्हाण भोकरमध्येच गुंतून रहावे यासाठी भाजपने चक्रव्यूह रचलंय. या चक्रव्युहातून ते कसे बाहेर येतील हाच खरा प्रश्न आहे. कारण, एकट्या नांदेड जिल्ह्यात विधानसभेच्या नऊ जागा असून त्यासाठी चव्हाण वेळ देऊ शकले नाही तर काँग्रेसचा हा बालेकिल्ला कायम राखणं अवघड काम आहे. त्यातच नांदेडच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडीच्या रुपाने एक नवीन शत्रू काँग्रेससाठी तयार झाल्याने या वेळेला चव्हाण यांना जास्त मेहनत घ्यावी लागत आहे.

काय आहे भाजपची खेळी?

नांदेड जिल्हा हा स्वर्गीय शंकरराव चव्हाण (Ashok chavan bhokar) यांच्या नावामुळे सबंध देशात आजही ओळखला जातो. त्यानंतर अशोक चव्हाण यांनीही जिल्ह्यात स्वत:ची चांगली पकड निर्माण केली. काँग्रेसच्या बळावर अशोक चव्हाण मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले. आदर्श घोटाळ्यामुळे मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार झाल्यानंतर त्यांच्या राजकीय कारकीर्दीला उतरती कळा लागली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा तब्बल 40 हजार मतांनी पराभव झाला.

स्वतः चव्हाण यांना हा पराभव म्हणजे मोठा धक्का होता. आता या धक्क्यातून सावरण्यासाठी त्यांनी अक्षरशः कंबर कसली आहे. स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांचा मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या भोकर विधानसभा मतदारसंघातून चव्हाण मैदानात उतरणार आहेत. मात्र चव्हाण हे तिथेच गुंतून राहावेत यासाठी भाजपने चांगलीच खेळी केली आहे.

राज्यभर फिरणार असल्याचा दावा

भाजपने काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीनिवास देशमुख गोरठेकर यांना पक्षात घेतलं. गोरठेकर यांना माननारा एक मोठा वर्ग याच मतदारसंघात आहे. त्यामुळे भोकर विधानसभेसाठीचा सामना रंगतदार होईल अशी चिन्हे आहेत. त्यामुळे सध्या अशोक चव्हाण पूर्णपणे भोकर विधानसभा मतदारसंघाकडे लक्ष ठेवून आहेत. असं असलं तरी मी नांदेडसह राज्यात सर्वत्र प्रचाराला जाणार आहे, असं चव्हाण सांगतात. त्यासोबतच भोकर मतदारसंघात यावेळी चांगला बदल होईल, असा दावा चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

काँग्रेसच्या सुरक्षित मतदारसंघात भाजपची प्रचारात आघाडी

मतदारसंघ पुनर्रचनेच्या अगोदर 2004 ला याच भोकरमधून राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर श्रीनिवास देशमुख गोरठेकर विजयी झाले. मात्र 2009 ला मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि अशोक चव्हाण यांच्यासाठी हा मतदारसंघ सुरक्षित बनला. आता अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध भाजपने राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीनिवास देशमुख गोरठेकर यांना मैदानात उरवलंय.

लोकसभेला अशोक चव्हाण यांना पराभूत केलेल्या खासदार प्रताप पाटील चिखलीकरांचं पाठबळ गोरठेकरांसोबत आहे. गोरठेकर हे ज्येष्ठ नेते असूनही त्यांनी आतापासूनच प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. माजी मुख्यमंत्री राहिलेल्या चव्हाण यांच्या मतदारसंघात अनेक समस्या कायम आहेत. त्यामुळे आपलाच विजय निश्चित असल्याची खात्री गोरठेकर देतात. गोरठेकर यांच्यासाठी भाजपची यंत्रणा कामाला लागली असून अगदी सूक्ष्म पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवल्या जात आहेत.

लोकांची सहानुभूती सोबत, पण चुका सुधारण्याचं आव्हान

लोकसभा निवडणुकीत नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीने दीड लाखांपेक्षा जास्त मतं मिळवली. आता विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडीचा फॅक्टर जोरात सक्रिय आहे. त्यामुळे भोकरमध्ये तिहेरी लढत रंगणार असल्याने चव्हाण यांना मोठी मेहनत घ्यावी लागत आहे. त्यातून सबंध राज्यात जनाधार असलेले काँग्रेसचे एकमेव नेते अशोक चव्हाण शिल्लक राहिलेत. त्यामुळे चव्हाण यांना संपवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. भाजपच्या या चक्रव्युहातून ते बाहेर येतील का हाच खरा प्रश्न आहे. स्थानिकांची सहानुभूती अजूनही अशोक चव्हाण यांच्या बाजूने आहे. पण विरुद्ध दिशेने वाहत असलेल्या या वाऱ्यात टिकण्यासाठी त्यांना मोठी मेहनत घ्यावी लागेल असं राजकीय विश्लेषकांना वाटतं.

लोकसभा निवडणुकांच्या वेळी झालेल्या चुका सुधारण्याचं काम चव्हाण सध्या करत आहेत. मध्यंतरी सर्वसामान्य मतदारांशी चव्हाण यांचा संपर्क दुरावला होता. त्यामुळे आता सर्वसामान्यांशी थेट संबंध ठेवण्यात चव्हाण पुढाकार घेत आहेत आणि त्यातच त्यांचा बहुतांश वेळ जातोय. त्यामुळे चव्हाण सध्या पूर्णपणे भोकर विधानसभेच्या निवडणुकीत गुंतले आहेत. या राजकीय घडामोडीमुळे सबंध राज्याचं लक्ष भोकरच्या निवडणुकीकडे असणार आहे. त्यामुळे चव्हाण निवडणूक काळात नांदेडबाहेर जाऊन काँग्रेसचा प्रचार कसा करणार हा मोठा प्रश्न आहे.