राष्ट्रवादीची खेळी फडणवीसांच्या जिव्हारी, अहमदनगरमधील राजकीय खेळीनंतर भाजपची मनोज कोतकरांना नोटीस

| Updated on: Sep 29, 2020 | 10:57 AM

मनोज कोतकर यांनी दोनच दिवसांपूर्वी स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

राष्ट्रवादीची खेळी फडणवीसांच्या जिव्हारी, अहमदनगरमधील राजकीय खेळीनंतर भाजपची मनोज कोतकरांना नोटीस
Follow us on

अहमदनगर : अहमदनगर महापालिकेतील स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने केलेली खेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. अहमदनगर महापालिकेचे नवनिर्वाचित सभापती मनोज कोतकर यांना भाजपकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. (BJP sends notice to Manoj Kotkar after Ahmednagar Standing Committees Chairman Election)

मनोज कोतकर यांनी दोनच दिवसांपूर्वी स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपचे अहमदनगर शहराध्यक्ष भैया गंधे यांनी कोतकरांना नोटीस पाठवून उत्तर मागितले आहे.

आपण कोणत्या पक्षात आहात, हे जाहीर करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा भाजपने मनोज कोतकर यांना दिला आहे. ‘कोतकरांचे कृत्य हा पक्षांतरबंदी कायद्यानुसार गुन्हा आहे. त्यामुळे ते नेमक्या कोणत्या पक्षाचे सभापती आहेत, हे त्यांनी स्पष्ट करावं. यासाठी तीन दिवसात उत्तर देण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल’ अशी प्रतिक्रिया भैया गंधे यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना दिली.

दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्याशी संपर्क साधला असता या नोटिसीबद्दल आपल्याला कोणतीही माहिती नाही, असे जगतापांनी सांगितले. मात्र भाजपने कायदेशीर कारवाईचा मार्ग निवडल्यास कोतकरांची सभापतीपद धोक्यात येण्याची भीती वर्तवली जात आहे.

काय आहे प्रकरण?

स्थायी समिती सभापतींच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर महापालिकेत राजकीय घडामोडींना वेग आला होता. स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी भाजपचे दावेदार मानले जाणाऱ्या मनोज कोतकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. इतकंच नाही, तर सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे कोतकर यांची स्थायीच्या सभापतीपदी वर्णीही लागली. भाजपवासी असतानाही मनोज कोतकर हे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे कट्टर समर्थक मानले जात होते.

अहमदनगर महापालिकेत शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष अंतर्गत वाद मिटवून एकत्र आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा झाल्यानंतर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी मध्यस्थीची भूमिका बजावली. स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांना एकत्र आणण्याची भूमिका बजावली. शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यातही याबाबत चर्चा घडवून नगर मधील अंतर्गत वादाला पूर्णविराम दिला. (BJP sends notice to Manoj Kotkar after Ahmednagar Standing Committees Chairman Election)

अहमदनगर पालिकेच्या स्थायी समितीची निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली. शिवसेनेच्या योगीराज गाडे यांचा उमेदवारी अर्ज पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार मागे घेण्यात आला.

संबंधित बातम्या :

अहमदनगरमध्ये राजकीय भूकंप, सभापतीपदाच्या रिंगणातील भाजप नगरसेवक राष्ट्रवादीत

शिवसेनेने शब्द पाळला, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

(BJP sends notice to Manoj Kotkar after Ahmednagar Standing Committees Chairman Election)