मोठी बातमी! महापालिका एकत्र लढवायची की नाही? अखेर महायुतीत काय ठरलं?

महायुती स्थानिक स्वराज्य संस्थांची निडवडणूक एकत्र लढवणार का असे विचारले जात होते. याबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे.

मोठी बातमी! महापालिका एकत्र लढवायची की नाही? अखेर महायुतीत काय ठरलं?
eknath shinde and ajit pawar and devendra fadnavis
| Updated on: Jun 24, 2025 | 9:40 PM

 Local Body Election : आगामी काळात कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्यामुळेच राज्यातील सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक सध्या सर्वच पक्षांसाठी फार महत्त्वाची आहे. ठाकरे गट, शिंदे गट आणि भाजपासाठी तर ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. त्यामुळे महायुती ही निवडणूक एकत्र लढणार की महायुतीचे घटकपक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार, याबाबत अनेकांची उत्सुकता ताणली गेली आहे. दरम्यान, आता याबाबत माहायुतीची भूमिका समोर आली आहे.

महायुती म्हणून निवडणूक लढवण्यावर भर

मिळालेल्या माहितीनुसार महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्याकरिता आज (24 जून) महायुतीच्या घटकपक्षांत चर्चा झाली. विधानसभेचा ट्रे़ंड राखण्यासाठी ही चर्चा होती, अशी माहिती शिंदे गटाचे नेते तथा मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. तसेच आणखी एक बैठक होणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. सध्या पार पडलेली बैठक ही राज्य समन्वय समितीची होती. या बैठकीत स्थानिक नेत्यांना आदेश दिले जातात. अंतर्गत काही मतभेद असतील तर वरिष्ठ नेते लक्ष घालतील. ते स्थानिक नेत्यांची समजूत घालतील, असे सांगत स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक महायुती म्हणून समोरे जाण्यावर भर असल्याचे त्यांनी सांगितले.

महायुतीचे सरकार आले, मतभिन्नता असू शकते, पण..

तसेच, नकारात्मक विचार करू नका. विधानसभेत आमचे पटणार नाही असेच सर्वजण बोलत होते. चिट्टी काढणारा पोपट बोलत होता की महाविकास आघाडी बहुमतात विजयी होईल. पण त्याविरुद्ध सर्व झाले. महायुतीचे सरकार आले. मतभिन्नता असू शकते. स्थानिक पातळीवर प्रश्न सुटला नाही, तर राज्य पातळीवर सुटेल असेही शंभूराज देसेई यांनी सांगितले.

राज्य पातळीवर आता चर्चा झाली, आता…

अजित पवार यांच्या पक्षाचे नेते तथा खासदार सुनिल तटकरे यांनीदेखील या बैठकीनंतर प्रतिक्रिया दिली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत खेळीमेळीच्या वातावरण चर्चा केली. विशिष्ट कालावधीत निवडणूक होईल. महायुतीसंदर्भात पुढच्या आठवड्यात पुन्हा चर्चा होईल. आजच्या बैठकीत महामंडळ वाटपाबाबत चर्चा झाली. विधानसभेच्या निवडणुकीवेळी वरिष्ठ नेते एकत्र बसले व मतदारसंघांचे वाटप झाले. तसाच निर्णय आताही होईल. राज्य पातळीवर आता चर्चा झाली आहे. स्थानिक पातळीवर नंतर चर्चा होईल. विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आहे. त्यामुळे लोकभावनेचा आदर करून पुढे जाऊ, अशी प्रतिक्रिया तटकरे यांनी दिली.