विधानसभेपूर्वी भाजपचा नवा सर्व्हे, महायुतीला तब्बल 229 जागांचा अंदाज

| Updated on: Sep 03, 2019 | 2:16 PM

महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक (Maharashtra Assembly Election) जशी जवळ येत आहे, तशी राजकीय घडामोडींना वेग येत आहे. सत्ताधारी पक्षासह विरोधीपक्ष देखील वेगवेगळ्या यात्रांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी केलेला सर्वे समोर आला आहे.

विधानसभेपूर्वी भाजपचा नवा सर्व्हे, महायुतीला तब्बल 229 जागांचा अंदाज
Follow us on

मुंबई: महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक (Maharashtra Assembly Election) जशी जवळ येत आहे, तशी राजकीय घडामोडींना वेग येत आहे. सत्ताधारी पक्षासह विरोधीपक्ष देखील वेगवेगळ्या यात्रांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच आता आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीला (BJP-Shivsena Alliance) 288 पैकी 229 जागा मिळत आहेत, असा सर्वे समोर आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपने महायुती लक्षात घेऊनच हा सर्व्हे (BJP Survey) केला आहे.

भाजपच्या या ताज्या सर्व्हेत विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व 229 जागा मिळतील असा दावा केला. भाजपनं महायुती लक्षात घेऊन सर्व्हे केल्याने भाजप-शिवसेनेत कुरबुरी होत असल्या तरी ते एकत्रित निवडणूक लढतील, हे स्पष्ट होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजप पुन्हा जिंकणार असल्याचे सांगत आपण पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा केली. त्यासाठी महाजनादेश यात्रेच्या (Mahajanadesh Yatra) माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रात वातावरणनिर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. स्वतः अमित शाह यांनी यात सहभागी होऊन फडणवीसांना बहुमताने निवडून देण्याचं आवाहन केलं आहे.

दुसरीकडं भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेने देखील आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदासाठी पुढे केल्याचं चित्र आहे. तशी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी आदित्य ठाकरे राज्यभरात फिरत आहेत. शिवसेनेकडून त्यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघ शोधण्याच्या हालचाली सुरू असल्याचेही बोलले जात आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी (Congress NCP) या विरोधीपक्षांनी देखील भाजप-शिवसेनेविरोधात जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेसने पर्दाफाश (Pardafash Yatra) यात्रा, तर राष्ट्रवादी काँग्रेसने शिवस्वराज्य (Shivswarajya Yatra) यात्रा काढली आहे. मात्र, अद्याप विरोधकांना एकी साधता आलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली असून अनेक नेते भाजप-शिवसेनेच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे येणाऱ्या काळतच स्पष्ट होईल.