Bihar Political Crisis : बिहारमध्ये भाजपचा ‘शिंदे प्रयोग’ फसला, सावध नितीशकुमारांचा झटका, बिहारमध्ये नेमकं काय शिजत होतं? वाचा सविस्तर

| Updated on: Aug 09, 2022 | 2:37 PM

Bihar Political Crisis : राज्यात चिराग मॉडेल होणार असल्याचं जेडीयूकडून सांगितलं जात होतं. आरसीपी सिंह यांच्या हालचालीवरून जेडीयूने तसं विधान केलं होतं. 2020च्या विधानसभा निवडणुकीत चिराग मॉडेलद्वारे भाजपने जेडीयूला 43 जागांवर रोखले होते.

Bihar Political Crisis : बिहारमध्ये भाजपचा शिंदे प्रयोग फसला, सावध नितीशकुमारांचा झटका, बिहारमध्ये नेमकं काय शिजत होतं? वाचा सविस्तर
इकडं काडीमोड तिकडं लगेच सत्तेचं बाशिंग, नितीशकुमारांची महागठबंधनच्या नेतेपदी निवड
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पाटणा: बिहारमधील नितीश कुमार (Nitish Kumar) सरकारने अखेर भाजपपासून (bjp) फारकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. आज दुपारी 4 वाजता नितीश कुमार हे राज्यपालांना भेटणार असून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. त्यानंतर काँग्रेस, डावे आणि आरजेडीशी महाआघाडी करून नितीशकुमार सत्ता स्थापण्याचा दावा करणार आहेत. त्यामुळे बिहारमधील राजकीय समीकरणे (Bihar Politics) आज संध्याकाळपर्यंत बदललेली दिसणार आहेत. नितीशकुमार यांनी भाजपशी युती तोडण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांना आश्चर्य वाटलं. पण नितीशकुमार यांनी हा अचानक घेतलेला निर्णय नाही. नितीशकुमार यांनी ठरवून घेतलेला हा निर्णय आहे. महाराष्ट्रात भाजपने जो शिंदे प्रयोग केला. तसाच प्रयोग बिहारमध्ये केला जात होता. त्याची कुणकुण नितीशकुमार यांना लागताच ते सावध झाले आणि शिंदे प्रयोग-2 बिहारमध्ये रंगण्याआधीच त्यांनी भाजपला वाऱ्यावर सोडून सवतासुभा मांडला आहे.

बिहारचे शिंदे कोण?

बिहारमध्ये भाजपने जेडीयूचे एक पूर्वीचे नेते आरसीपी सिंह यांच्या माध्यमातून जेडीयूमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू केला होता. आरसीपी सिंह हे जेडीयूचे राज्यसभेतील खासदार होते. त्यांना तिसऱ्यांदा राज्यसभेवर पाठवण्यात आलं होतं. त्यांना केंद्रात मंत्रीपदही देण्यात आलं होतं. मात्र, चौथ्यांदा त्यांना राज्यसभेवर पाठवलं गेलं नाही. त्यामुळे त्यांचं मंत्रिपदही गेलं. त्यामुळे ते नाराज होते. आरसीपी सिंह यांच्यासाठी जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन सिंह ऊर्फ ललन सिंह यांना केंद्रात मंत्रिपद मिळू शकलं नव्हतं. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता. आरसीपी हे केंद्रात मंत्री बनण्यापूर्वी जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांना केंद्रात मंत्रीपद द्यावं लागलं होतं. पण त्यांना मंत्रीपद देणं नितीश कुमार यांनाही आवडलं नव्हतं. आरसीपी सिंह अनेक कारणांमुळे नितीश कुमार यांच्या नजरेतून उतरत चालले होते.

हे सुद्धा वाचा

ललन सिंह यांच्या मुंगेर या मतदारसंघात आरसीपी सिंह यांची ढवळाढवळ सुरू झाली होती. आरसीपी सिंह यांनी मुंगेर येथे दौरा केला होता. त्यावेळी बिहार का सीएम कैसा हो, आरसीपी सिंह जैसा हो अशा घोषणा दिल्या गेल्या. त्यामुळे नितीश कुमारही आरसीपी सिंह यांच्यावर नाराज झाले होते. त्यामुळे आरसीपी यांना नितीश कुमार यांनी पक्षातून कॉर्नर केलं होतं. त्यामुळे भाजपने आरसीपी सिंह यांना जवळ करण्याचे प्रयत्न सुरू केले होते.

आरसीपी सिंह यांचा भाजपकडून वापर

आरसीपी सिंह हे नितीश कुमार यांच्या नंतरचे पक्षातील दोन नंबरचे नेते होते. तिकीट देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. आरसीपी सिंह यांच्या वाढत्या वर्चस्वामुळे जेडीयूचे नेते सावध झाले होते. आरसीपी सिंह यांच्या माध्यमातून भाजप पक्ष तोडण्याचा प्रयत्न तर करत नाही ना, असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला. त्यानंतर जेडीयूच्या काही आमदारांना फोन गेले. आरसीपी सिंह यांच्या माध्यमातून भाजपने या आमदारांना फोन करून आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला होता. जेडीयूच्या आमदारांनी हे फोन रेकॉर्ड केले होते.

चिराग मॉडेलचा डाव उधळला

त्यानंतर जेडीयूने आरसीपी सिंह यांना निर्णय प्रक्रियेतून बाजूला केले आणि आमदारांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. राज्यात चिराग मॉडेल होणार असल्याचं जेडीयूकडून सांगितलं जात होतं. आरसीपी सिंह यांच्या हालचालीवरून जेडीयूने तसं विधान केलं होतं. 2020च्या विधानसभा निवडणुकीत चिराग मॉडेलद्वारे भाजपने जेडीयूला 43 जागांवर रोखले होते. त्यानंतर आरसीपी सिंह यांच्या माध्यमातून दुसरं चिराग मॉडेल घडवून आणण्याचा भाजपचा डाव होता. नितीश कुमार यांना एकटं पाडण्याची ही खेळी होती. मात्र, नितीश कुमार यांनी ही खेळी उलथवून लावली आहे.