विनोद तावडे यांच्याकडून संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी, म्हणाले, ‘मुख्यमंत्री आणि पवारसाहेबांकडून अपेक्षा’

| Updated on: Feb 26, 2021 | 1:12 PM

भाजप नेते विनोद तावडे यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. | VInod Tawde

विनोद तावडे यांच्याकडून संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी, म्हणाले, मुख्यमंत्री आणि पवारसाहेबांकडून अपेक्षा
शरद पवार, विनोद तावडे आणि उद्धव ठाकरे
Follow us on

सिंधुदुर्ग : भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसंच अशा प्रकरणात पक्षनेतृत्व संवेदनशील असावं लागतं असं म्हणत मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्याकडून अपेक्षा असल्याचंही ते म्हणाले. (BJP Vinod tawde Demand Sanjay Rathod resignation)

सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील लोकांवर असे आरोप होतात. त्यावेळी नेतृत्वाने अतिशय संवेदनशीलपणे असायला हवं. कारण या गोष्टी लोकांच्या मनावर परिणाम करत असतात.असं असताना मुख्यमंत्री असतील किंवा पवार साहेब असतील अशा जबाबदार व्यक्तींकडून कारवाईची कृती सामान्य माणसाला अपेक्षित आहे, असं विनोद तावडे म्हणाले.

मुख्यमंत्री आणि पवारसाहेबांकडून अपेक्षा

सर्वसामान्य माणसाला आज राठोड यांचा राजीनामा हवा आहे. कारण एका सर्वसामान्य मुलीचा जीव गेलाय आणि तिच्या आत्महत्या प्रकरणात मंत्री महोदयांचं नाव आलंय. त्यामुळे लोकांच्या मतानुसार राठोड यांच्या राजीनाम्याचा भारतीय जनता पक्ष आग्रह धरत आहे.अधिवेशनच्या आधी राजीनामा घेण्याची कृती कुठलंही संवेदनशील नेतृत्व नक्की करेल अस मला वाटतं, असं तावडे म्हणाले.

सामनाच्या संपादकीयमध्ये आता कथा लेखनाला सुरुवात

सामनाच्या संपादकीयमध्ये आता कथा लिहायला सुरुवात झाली आहे. कथेने काही होणार नाही. जगामध्ये सर्वत्र इंधनाची दरवाढ होते आहे हे लोकांना माहिती आहे. कर्नाटक, गुजरात आणि गोव्यामध्ये महाराष्ट्रापेक्षा पेट्रोल-डिझेलवर कर कमी आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेल तिथे स्वस्त आहे. मग अशा परिस्थितीत इंधनावरचे कर संजय राऊत यांचं सरकार कमी का करत नाही? श्रीलंका नेपाळ सोडा तुमच्या बाजूच्या राज्यात जर दर कमी आहे तर मग आपल्याकडे दर जास्त का आहेत याच उत्तर त्यांनी द्यावं, असंही तावडे म्हणाले.

अधिवेशनामुळे कोरोना वाढेल आणि बार चालू केल्यामुळे नाही, सामान्य माणसाला न पटणारी गोष्ट

समाजातल्या सगळ्या व्यवस्था सुरु केल्या आणि विधिमंडळ जे अतिशय सुरक्षित असतं तिथे आपण कोरोनाची चाचणी करूनच प्रवेश देतो. विधिमंडळ अधिवेशन चालू केल्यामुळे कोरोना वाढेल आणि बार चालू केल्यामुळे कोरोना वाढत नाही हे सामान्य माणसाला न पटणारी गोष्ट आहे, असं ते म्हणाले.

अंबानींच्या घराबाहेर गाडी पोहोचलीच कशी

उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर अतिशय गंभीर गोष्ट आहे. तो व्हीआयपी रोड आहे. त्यामुळे ती कार तिथपर्यंत पोचली कशी? दहशतवादी संघटना सक्रिय झाल्यात का? जर झाल्या असतील तर सरकार नाही तर सर्वांनी मिळून उत्तर द्यावं लागेल. राज्य सरकार वर टीका करून उपयोग नाही. सगळ्यांनी मिळून दशतवादाचा सामना करणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले. (BJP Vinod tawde Demand Sanjay Rathod resignation)

हे ही वाचा :

Pooja Chavan case : 18 दिवसात 18 योगायोग आणि 18 विसंगती!

कोरोनाबाबत शंका असेल तर कोरोनाबाधित मंत्र्यांच्या संपर्कात या, हसन मुश्रीफांचं विरोधकांना आव्हान