Breaking : राज्यपाल नियुक्त आमदारांबाबतची कोंडी फुटणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांच्या भेटीला

| Updated on: Sep 01, 2021 | 8:18 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले आहेत. त्यामुळे आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा आता मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Breaking : राज्यपाल नियुक्त आमदारांबाबतची कोंडी फुटणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांच्या भेटीला
उद्धव ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात राज्यपालांच्या भेटीला
Follow us on

मुंबई : विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीबाबतची कोंडी फुटेल का? असा प्रश्न पुन्हा एकदा विचारला जात आहे. कारण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले आहेत. त्यामुळे आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा आता मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काही नावांवर आक्षेप घेऊ शकतात, अशीही एक शक्यता व्यक्त केली जात आहे. (CM Uddhav Thackeray, Ajit Pawar and Balasaheb Thorat meet Governor Bhagat Singh Koshyari)

26 ऑगस्ट रोजी महाविकास आघाडी सरकारकडून राजभवनाकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीची वेळ मागण्यात आली होती. पण राजभवनाकडून वेळ देण्यात आली नाही, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं होतं. तर दुसरीकडे त्याच दिवशी संध्याकाळच्या सुमारास शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर राजभवनावर दाखल झाले होते. त्यांनी राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितली. त्यानंतर राजभवनाकडून 1 सप्टेंबरला भेटीसाठी वेळ देण्यात आली होती.

खडसे, राजू शेट्टींचा पत्ता कट?

दरम्यान, राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेट्टी यांच्या ऐवजी दुसरं नाव दिलं जाण्याची शक्यता आहे. तर खडसे यांची ईडी चौकशी सुरु असल्यानं राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून त्यांच्या नावाला आक्षेप घेतला जाऊ शकतो, असंही बोललं जात आहे.

सुधीर मुनगंटीवारांचा टोला

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जर चहापानासाठी किंवा चाय पे चर्चा करण्यासाठी बोलावलं असेल तर जरुर जावं. पण फक्त 12 आमदारांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावर ते राज्यपालांच्या भेटीला जात असतील तर ते दुर्दैवी आहे. कारण महाराष्ट्रात एमपीएससीची पद रिक्त आहेत. आरोग्य सेवकांची पदं रिक्त आहे. त्या संदर्भातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घ्यायला हवी, असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावलाय.

12 सदस्यांमध्ये कोणाची नावं?

काँग्रेस

1) सचिन सावंत
2) रजनी पाटील
3) मुजफ्फर हुसैन
4) अनिरुद्ध वनकर

राष्ट्रवादी काँग्रेस

1) एकनाथ खडसे
2) राजू शेट्टी
3) यशपाल भिंगे
4) आनंद शिंदे

शिवसेना

1) उर्मिला मातोंडकर
2) नितीन बानगुडे पाटील
3) विजय करंजकर
4) चंद्रकांत रघुवंशी

इतर बातम्या :

‘राज्याच्या राजकारणात पाठीत खंजीर खुपसणारा दुसरा चेहरा’, चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

केंद्रातील मोदी सरकार सामान्य जनतेला चिकटलेला ‘जळू’, इंधनाच्या किमती वाढवून रक्तशोषण, नाना पटोलेंचा घणाघात

CM Uddhav Thackeray, Ajit Pawar and Balasaheb Thorat meet Governor Bhagat Singh Koshyari