सरनाईक यांच्या रिसॉर्टसाठी तामलवाडीत दुकानदारांवर बुलडोझर, हाच का तुमचा न्याय, काँग्रेसच आरोप..
काँग्रेसच्या आरोपांनुसार मंत्री सरनाईक यांनी हायवेला टच असलेली १९ एकर जमीन रिसॉर्ट बांधण्यासाठी घेतली आहे. जमीन खरेदीनंतर त्या भागातील अतिक्रमित दुकानं, हॉटेल आणि सरकारी शौचालयांवर देखील बुलडोजर चालवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

धाराशीवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी तुळजापूर रोडवर घेतलेली १९ एकर जमीन वादात सापडली आहे.हायवेला टच असलेली १९ एकर जमीन रिसॉर्ट बांधण्यासाठी घेतली आहे. जमीन खरेदीनंतर त्या भागातील अतिक्रमित दुकानं, हॉटेल आणि सरकारी शौचालयांवर देखील बुलडोजर चालवण्याचे आदेश काढण्यात आले आहेत असा आरोप काँग्रेसने केला आहे. स्वतः च्या रिसॉर्टचा रस्ता मोकळा करण्यासाठी गरीबांच्या पोटावर पाय हाच का तुमचा सोयीस्कर बुलडोझर न्याय असा सवाल काँग्रेसने केला आहे.
माहितीनुसार पालक मंत्री सरनाईक यांच्या कथित नव्या रिसॉर्टसाठी अडथळा नको म्हणून त्या भागातील अतिक्रमित कामे पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर मंत्र्यांच्या रिसॉर्टसाठी अतिक्रमण निघत असेल तर मग तुळजापूर आणि धाराशीव शहरातली अतिक्रमणे का नाही असाही प्रश्न केला जात आहे. ही जमीन आपण शेतीसाठी घेतल्याचा दावा पालक मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे.
प्रताप सरनाईक यांचा ‘विकास’ नेमका कुणासाठी?
धाराशीवमधील तामलवाडी टोलनाक्याजवळ दुकाने, हॉटेल आणि सार्वजनिक शौचालयांवर बुलडोझर चालवण्याचे आदेश… आणि याच परिसरात पालकमंत्र्यांची जवळपास २० एकर हायवे-टच जमीन आणि रिसॉर्टचे काम सुरू आहे! गरीबांचा रोजगार उद्ध्वस्त करून, शेतकऱ्यांच्या जमिनींवर बुलडोझर चालवून नेमका कुणाचा मार्ग मोकळा केला जातोय? अतिक्रमण हटवण्यासाठी तामलवाडीचाच एवढा ‘विशेष’ आग्रह का? स्वतः च्या रिसॉर्टचा रस्ता मोकळा करण्यासाठी गरीबांच्या पोटावर पाय हाच का सोयीस्कर बुलडोझर न्याय आहे का असा सवाल काँग्रेसने समाजमाध्यमावर केला आहे.
मित्र पक्षाकडून आरोप…
मविआ सरकार असताना भाजपाच्या किरीट सोमय्या यांनी सरनाईक यांच्यावरच जमीन खरेदीवरुन गंभीर आरोप केले होते. ते सरनाईक आता भाजपसोबत सत्तेत असले तरी जमीन खरेदीवरुन त्यांच्यावर होणारे आरोप थांबलेले नाहीत. विशेष म्हणजे सरनाईक महायुतीत सत्तेत भाजपासोबत असले तरी भाजपाचेच आमदार नरेंद्र मेहता यांनीही मीरा-भाईंदरमधल्या सरनाईक यांच्या रिसॉर्टवरही आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपांनुसार एकीकडे महाराष्ट्र खड्ड्यात असताना सरनाईक यांनी महापालिकेचे ५० कोटी खर्च करुन फक्त त्यांच्या रिसॉर्डकडे जाणारा रस्ता बांधल्याचा आरोपही केला आहे.