उद्धवजी, लोण्याचा गोळा कोण मटकावतंय, लक्षात आलंय का? ZP निकालावर चंद्रकांतदादांची ‘इशारा’ देणारी फेसबुक पोस्ट

| Updated on: Oct 07, 2021 | 9:35 AM

चारही पक्षांमध्ये सर्वाधिक जागा मिळविण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी झाला. 85 जिल्हा परिषद जागांपैकी भाजपने सर्वाधिक 23 जागा जिंकल्या. काँग्रेसनेही मुसंडी मारली. राष्ट्रवादीला बऱ्यापैकी यश मिळालं. मात्र राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही सेना तिसऱ्या क्रमाकांवर फेकली गेली.

उद्धवजी, लोण्याचा गोळा कोण मटकावतंय, लक्षात आलंय का? ZP निकालावर चंद्रकांतदादांची इशारा देणारी फेसबुक पोस्ट
चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे.
Follow us on

मुंबई :  जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीने भाजपला जोरदार टक्कर दिली. झेडपी निकालात महाविकास आघाडी भाजपला वरचढ ठरली. 85 जागांपैकी 46 जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. परंतु चारही पक्षांमध्ये सर्वाधिक जागा मिळविण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी झाला. 85 जिल्हा परिषद जागांपैकी भाजपने सर्वाधिक 23 जागा जिंकल्या. काँग्रेसनेही मुसंडी मारली. राष्ट्रवादीला बऱ्यापैकी यश मिळालं. मात्र राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही सेना तिसऱ्या क्रमाकांवर फेकली गेली. याच निकालावर अतिशय बोलकी फेसबुक पोस्ट लिहित भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जागं करण्याचा प्रयत्न केला आहे.

लोण्याचा गोळा कोण मटकावतंय, उद्धवजी सुज्ञ आहेत!

आमचा एकेकाळचा मित्रपक्ष शिवसेना जि.प. निवडणुकीत तिसऱ्या स्थानी गेल्याचं स्पष्ट झालंय. राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्या पक्षावर ही वेळ यावी? लोण्याचा गोळा कोण मटकावतंय, हे आता त्यांच्या लक्षात आलं असावं, असं सांगताना महाविकास आघाडीत शिवसेनेचं नुकसान होतंय, असंच एकप्रकारे चंद्रकांत पाटील यांना सांगायचंय. त्याच्याही पुढे जाऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेस लोण्याचा गोळा मटकावतंय, असं सांगण्याचा चंद्रकांत पाटील यांनी प्रयत्न केलाय. तसंच उद्धव ठाकरे जनभावना लक्षात घेण्याइतके सुज्ञ नक्कीच आहेत, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटील यांची फेसबुक पोस्ट

“जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल पाहता, जि.प. निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष भाजपाच ठरला आहे. तर तीन पक्षांशी लढत असूनही पंचायत समितीतही भाजपाची कामगिरी दमदारच झालेली आहे. निकालाबद्दल मतदारांचे आभार, कार्यकर्त्यांचे अभिनंदन. आम्ही पुन्हा जोमाने कामाला लागू”

“एकेकाळचा मित्रपक्ष शिवसेना मात्र या निवडणुकीत तिसऱ्या स्थानी गेल्याचं स्पष्ट झालंय. राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्या पक्षावर ही वेळ यावी? लोण्याचा गोळा कोण मटकावतंय, हे आता त्यांच्या लक्षात आलं असावं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनभावना लक्षात घेण्याइतके सुज्ञ नक्कीच आहेत.”

‘आता विचार शिवसेनेनं करायचा आहे’, फडणवीसांची बोलकी प्रतिक्रिया

महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेच्या जोरावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस वाढत आहे, हे या निवडणुकीवरुन समजतं. शिवसेना रसातळाला जात आहे आणि भाजप एक नंबरचा पक्ष होत असल्याची प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली. भाजप जि.प. निवडणुकीत क्रमांक एकचा पक्ष ठरल्याने फडणवीस यांनी जनतेचे आभार मानले. आमचे स्थानिक नेतेच नेतृत्व करतील, मोठे नेते प्रचाराला जाणार नाहीत. नागपूर जिल्हा परिषदेत एक जागा कमी झाली पण पंचायत समितीत जास्त यश मिळालं. राज्यात तीन पक्षांची स्पेस कमी होताना दिसत असल्याचंही फडणवीस यावेळी म्हणाले. आता याचा विचार शिवसेनेनं करायचा आहे. यापुढेही आम्ही सगळी स्पेस अशीच खात राहणार, असा इशाराही फडणवीसांनी शिवसेनेला दिलाय.

(Chandrakant Patil Facebook Post warns Shivsena over Maharashtra ZP Election result)

हे ही वाचा :

ZP Election : झेडपीत तुमचा जुना मित्र शिवसेनेला तोटा होतोय? फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया