सर्व काही केंद्रावर ढकलणार, मग तुम्ही काय करणार?; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

| Updated on: May 01, 2021 | 1:42 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातील जनतेशी संवाद साधताना राज्यातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली. (chandrakant patil reaction on CM Uddhav Thackeray speech)

सर्व काही केंद्रावर ढकलणार, मग तुम्ही काय करणार?; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
chandrakant patil
Follow us on

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातील जनतेशी संवाद साधताना राज्यातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांच्या या संवादावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. सर्व काही केंद्र सरकारवर ढकलणार असाल तर राज्यकर्ते म्हणून तुम्ही काय करणार? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. (chandrakant patil reaction on CM Uddhav Thackeray speech)

चंद्रकांत पाटील यांनी एक प्रेस नोट काढली असून त्यात त्यांनी हा सवाल केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑक्सिजन, रेमडेसिवीर, कोरोना लस अशा प्रत्येक बाबतीत केंद्रावर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्व काही केंद्र सरकारनेच करायचे असेल तर राज्य सरकार स्वतःहून काय करणार, असा सवाल पाटील यांनी केला आहे.

… तर ऑक्सिजनसाठी धावाधाव झाली नसती

राज्यात कोरोनाची दुसरी लाट येणार ही अपेक्षा होती, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: कबूल केले आहे. पण त्या लाटेचा सामना करण्यासाठी मधल्या 5 महिन्यात राज्य सरकारने काय तयारी केली हे सांगितले नाही. रुग्णालयांना जोडून ऑक्सिजन निर्मितीसाठी प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत व ते काही दिवसात सुरू होतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. पण हा तहान लागल्यावर विहीर खणण्याचा प्रकार आहे. मुख्यमंत्र्यांनी नोव्हेंबर महिन्यातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली होती, तर गेल्या पाच महिन्यातच असे ऑक्सिजन प्रकल्प उभे केले असते तर आज त्यासाठी धावाधाव करावी लागली नसती. त्यांनी केंद्राने ऑक्सिजनचा 500 मेट्रिक टनांचा अधिक पुरवठा मंजूर केल्यामुळे राज्याची गरज जेमतेम भागते हे कबूल केले ते बरे झाले. राज्याला पंतप्रधानांच्या सूचनेनुसार रेमडेसिवीरचा पुरवठा वाढला असल्याचेही त्यांनी मान्य केले हे सुद्धा चांगले झाले, असा चिमटा त्यांन काढला आहे.

लसींची थेट खरेदी करता आली असती

आता 18 ते 44 वयोगटासाठी 12 कोटी लसी एक रकमी विकत घेण्यास तयार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. केंद्राने राज्य सरकारांना लसींची थेट खरेदी करण्याची परवानगी दिली असताना त्यासाठीही मुख्यमंत्र्यांनी केंद्राच्या मागे लपण्याची गरज नव्हती. लशीच्या उत्पादन व पुरवठ्याला मर्यादा आहे. त्यामुळे जशी लस उपलब्ध होईल, तशी दिली जाईल, असे मुख्यमंत्री आता सांगतात आणि तरुणांना केवळ नोंदणीनंतर संदेश आल्यानंतरच लसीकरणाला जा असेही सांगतात. त्यांनी अशीच जाणीव ठेवून 45 पेक्षा अधिकच्या वयाच्या नागरिकांच्या लसीकरणात शिस्त ठेवली असती तर गेले काही दिवस राज्यात जो लसीकरणाचा गोंधळ चालू आहे तो झाला नसता आणि ज्येष्ठ नागरिकांना उन्हात मनस्ताप सहन करावा लागला नसता, असंही ते म्हणाले.

वाढीव पॅकेजची गरज होती

राज्यात लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढविल्यामुळे सर्वसामान्य माणसाचे जे रोजगाराचे नुकसान होणार आहे, ते ध्यानात घेता मुख्यमंत्री काही वाढीव पॅकेज जाहीर करतील, असे वाटले होते पण त्यांनी निराशा केली. आधीच्या पॅकेजच्या अंमलबजावणीची त्यांनी दिलेली माहितीसुद्धा समाधानकारक नाही, असंही त्यांनी सांगितलं. (chandrakant patil reaction on CM Uddhav Thackeray speech)

 

संबंधित बातम्या:

CM Uddhav Thackeray speech highlights : 12 कोटी डोस एकरकमी घेतो, पण लस पुरवा : मुख्यमंत्री

‘ऑक्सिजनच्या तुटवड्याची माहिती आली की एसीत घाम येतो’, मुख्यमंत्र्यांच्या संवादातील 10 महत्त्वाचे मुद्दे

गरज नसताना रेमडेसिव्हीर दिल्यास दुष्परिणाम, अनावश्यक रेमडेसिव्हीरचा वापर टाळाः मुख्यमंत्री

(chandrakant patil reaction on CM Uddhav Thackeray speech)