उद्धव ठाकरेंचा जन्म राज्य नव्हे, पक्ष चालवण्यासाठी; चंद्रकांत पाटलांची खोचक टीका

| Updated on: Nov 25, 2020 | 8:29 PM

महाविकास आघाडीला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. (chandrakant patil taunt cm uddhav thackeray over administrative experience)

उद्धव ठाकरेंचा जन्म राज्य नव्हे, पक्ष चालवण्यासाठी; चंद्रकांत पाटलांची खोचक टीका
Follow us on

कोल्हापूर: महाविकास आघाडीला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. प्रशासन चालवणं हा वेगळा विषय आहे. उद्धव ठाकरे यांनी उभं आयुष्य पक्ष चालवण्यात घालवलं. त्यांचा प्रशासनाशी काय संबंध? उद्धव ठाकरे हे प्रशासनासाठी जन्मले नाहीत. ते पक्ष चालवण्यासाठीच जन्मले आहेत. त्यांना प्रशासनाशी संबंधित शंभर प्रश्न विचारले तर कॉपी करूनही उत्तरं देता येणार नाही, अशी घणाघाती टीका चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. (chandrakant patil taunt cm uddhav thackeray over administrative experience)

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंवर ही टीका केली. प्रशासन हा वेगळा विषय आहे. उद्धव ठाकरे हे प्रशासनासाठी जन्मले नाहीत. ते पक्ष चांगला चालवू शकतात. ते कधी आमदार झाले नाहीत. कधी खासदार झाले नाहीत. कधी नगरसेवकही झाले नाहीत आणि स्थायी समितीचे अध्यक्षही झाले नाहीत. प्रशासन चालवताना कोर्टात हजार प्रश्न घेऊन बसावं लागतं किंवा संबंधित अधिकाऱ्यांना प्रश्न हाताळण्याचे आदेश द्यावे लागतात. प्रशासनावर वचक असणं ही वेगळी बाब आहे, असं सांगतानाच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही पक्षावरच कायम कंट्रोल ठेवला. त्यांनी कधीच निवडणूक लढवली नाही. बाळासाहेबांनी जो नियम पाळला. तो उद्धव ठाकरेंनी पाळला नाही. एकदम अंगावर जबाबदारी पडल्यावर असं होतं. त्यामुळेच राज्यातील प्रश्न सोडवण्यात त्यांना अपयश आलं आहे, असं पाटील म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी क्रॉस सबसिडीचा अर्थ सांगावा

सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्यांनी सर्व्हे करावा आणि उद्धव ठाकरे प्रशासनात योग्य आहेत असं वाटते का? असा प्रश्न जनतेला विचारा. लोकही नाहीच म्हणून सांगतील. असं सांगतानाच उद्धव ठाकरे यांनी क्रॉस सबसिडी म्हणजे काय याचा अर्थ मला सांगावा. समोरासमोर बसू. मी शंभर प्रश्न विचारतो. त्यांनी पुस्तक पाहून उत्तरं द्यावीत. पण कोणत्या पुस्तकात उत्तर आहे हे सुद्धा त्यांना सांगता येणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

राऊतांचे हात कोणी बांधले?

यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही टीका केली. राऊत यांच्याकडे भाजपच्या 100 नेत्यांची नावे असतील तर त्यांनी त्वरीत ईडीला पाठवावी. लगेच पाठवावी, असं ते म्हणाले. आमचीही राज्यात सत्ता आहे. आम्हालाही चौकश्या लावता येतात, असा इशारा राऊत यांनी दिला होता. त्याचीही पाटील यांनी खिल्ली उडवली. राऊतांचं तोंड कुणी बांधले. कुणी तुमचे हात बांधलेत. खुशाल चौकश्या लावा. अभिनेत्री कंगना रनौत आणि पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्यावर कारवाई केलीच ना? तेव्हा तुमचे कोणी हात बांधले होते? त्यामुळे आता कुणी तुम्हाला अडवलंय. खुशाल कारवाई करा, असं आव्हानच पाटील यांनी दिलं. (chandrakant patil taunt cm uddhav thackeray over administrative experience)

 

संबंधित बातम्या:

आशिष शेलारांनी कंबर कसली, हैदराबादेतील मराठी मतं खेचण्याचा भाजपचा प्रयत्न

चंद्रकांतदादांना कुणी सांगितलं आम्हाला मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडली? अजित पवारांची फटकेबाजी

भाजप तपास यंत्रणाचा गैरवापर करत नाही : चंद्रकांत पाटील

(chandrakant patil taunt cm uddhav thackeray over administrative experience)