अर्णवला बेड्या ठोकल्या म्हणून सचिन वाझेला लटकवताय का? उद्धव ठाकरे आक्रमक

| Updated on: Mar 10, 2021 | 7:23 PM

अधिवेशनाचं सूप वाजल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्णव गोस्वामी प्रकरणावरुन फडणवीसांना टोला लगावला आहे.

अर्णवला बेड्या ठोकल्या म्हणून सचिन वाझेला लटकवताय का? उद्धव ठाकरे आक्रमक
Follow us on

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात नाव समोर आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या अन्य नेत्यांनी सभागृह दणाणून सोडलं. त्यावर सत्ताधाऱ्यांनीही अन्वय नाईक प्रकरणावर फडणवीसांना घेरण्याचा प्रयत्न केला. आता अधिवेशनाचं सूप वाजल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्णव गोस्वामी प्रकरणावरुन फडणवीसांना टोला लगावला आहे. एकाला बेड्या टाकून आरोपी किंवा संशयित म्हणून घेऊन गेले म्हणून सचिन वाझेंना लटकवताय का? असा खोचक सवाल मुख्यमंत्र्यांनी केलाय.(CM Uddhav Thackeray criticizes BJP leaders in Sachin Waze case without naming Arnav Goswami)

“सचिन वाझे पूर्वी शिवसेनेत होते. २००८ ला होते. त्यानंतर त्यांनी सदस्यत्व रिन्यू केलेलं नाही. त्यांचा शिवसेनेशी संबंध नाही. हिरेन प्रकरण लावून धरलं, ते धरायलाच हवं. मात्र डेलकर प्रकरणात तर भाजपचा मंत्री आहे. सचिन वाझे तर मंत्री नाही. पक्षपातीपणे का बघताय? सचिन वाझेला का लटकवताय? एकाला बेड्या टाकून आरोपी किंवा संशयित म्हणून घेऊन गेले म्हणून?”, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी अर्णव गोस्वामींचं नाव न घेता फडवीसांवर टीका केलीय. दरम्यान, अन्वय नाईक प्रकरणात अर्णव गोस्वामी यांना त्यांच्या निवासस्थानातून अटक करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये सचिन वाझे होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना हा सवाल केला आहे.

सचिन वाझे म्हणजे लादेन नाही – मुख्यमंत्री

मनसुख हिरेन आणि मोहन डेलकर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. आधी फाशी द्या आणि मग तपास करा, अशी तपासाची पद्धत नसते. कुणी तपासाला दिशा देऊ शकत नाही. एखाद्याला टार्गेट करायचं आणि त्याला आयुष्यातून उठवायचं अशी पद्धत सध्या सुरू आहे, असं सांगतानाच सचिन वाझे हे ओसामा बिन लादेनच आहेत, अशा पद्धतीने चित्रं तयार केलं जात आहे. ते कशासाठी?, असा सवालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केला आहे.

‘महाराष्ट्र कधी थांबला नाही आणि थांबणार नाही’

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं आज सूप वाजलं. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला. पूजा चव्हाण प्रकरण ते मनसुख हिरेन प्रकरणामुळे गाजलेल्या या अधिवेशनामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अधिवेशन घेणं कोरोनात आव्हानात्मक होतं. पण नियम पाळून अधिवेशन घेतलं. विरोधकांनीही उत्तम सहकार्य केलं. परवा अर्थसंकल्प सादर केला. आव्हानात्मक स्थिती असतानाही हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. तरीही रडगाणं न गाता ‘महाराष्ट्र कधी थांबला नाही आणि थांबणार नाही’, हे आपलं ब्रीद वाक्य आहे. त्यानुसार सर्व घटकांना आपण सामावून घेण्याचा, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

सचिन वाझे म्हणजे लादेन नाही, दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवई करणार; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना फटकारले

सचिन वाझे यांचा पाठलाग होत असल्याचा दावा, वेगवेगळ्या नंबरप्लेटमुळं ‘त्या’ गाडीविषयी संभ्रम वाढला?

CM Uddhav Thackeray criticizes BJP leaders in Sachin Waze case without naming Arnav Goswami