‘महाराष्ट्राशी माझं रक्ताचं आणि पारंपारिक नातं’, चिपी विमानतळाच्या उद्घाटनावेळी ज्योतिरादित्य शिंदेचं भावनिक भाषण

| Updated on: Oct 09, 2021 | 4:12 PM

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदेही या कार्यक्रमासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते. शिंदे यांनी यावेळी आपलं भाषण मराठीतून केलं. महाराष्ट्राशी माझं रक्ताचं आणि भावनिक नातं असल्याचं शिंदे यावेळी म्हणाले.

महाराष्ट्राशी माझं रक्ताचं आणि पारंपारिक नातं, चिपी विमानतळाच्या उद्घाटनावेळी ज्योतिरादित्य शिंदेचं भावनिक भाषण
चिपी विमानतळ उद्घाटन सोहळा, ज्योतिरादित्य शिंदे सहभागी
Follow us on

सिंधुदुर्ग : चिपी विमानतळाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत पार पडलं. त्यावेळी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदेही या कार्यक्रमासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते. शिंदे यांनी यावेळी आपलं भाषण मराठीतून केलं. महाराष्ट्राशी माझं रक्ताचं आणि भावनिक नातं असल्याचं शिंदे यावेळी म्हणाले. तसंच हे केवळ चिपी विमानतळाचं उद्घाटन नाही तर सिंधुदुर्गच्या नव्या अध्यायाला सुरुवात असल्याचा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केलाय. (Chipi Airport will be a major contributor to development of Sindhudurg, says Jyotiraditya Scindia)

‘छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा इतिहास’

‘माझा महाराष्ट्राशी फक्त राजकीय संबंध नाही. माझं एक पारंपरिक आणि रक्ताचं संबंध आहे. माझे सिंधुदुर्गासोबतही संबंध आहेत. सिंधुदुर्गाचा विशाल इतिहास आणि आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मोठा आहे. हा जिल्हा शौर्याचं प्रतिक आहे. मी 500 वर्षांपूर्वीच्या इतिहासाचं स्मरण करतो. छत्रपतींचा हिंदवी स्वराज्याचा विचार होता. एकीकडे पेशवे तर दुसरीकडे त्यांचे तीन प्रमुख सेनापती होते. शिंदे, होळकर आणि गायकवाड यांना एकत्र घेऊन शिवाजी महाराजांनी पोर्तुगिज आणि इंग्रजांना हरवलं होतं. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं. हा आमच्या मराठ्यांचा गौरव क्षण आहे. सिंधुदुर्गाची ही एक केसरीया धरती आहे. हे फक्त विमानतळाचं उद्घाटन नाही. आता नव्या अध्यायाला सुरुवात झाली. बाळासाहेब थोरात आणि नारायण राणे यांनीही सांगितलं की, माझ्या वडिलांचं विमानतळाचं एक स्वप्न होतं. त्यांनी रेल्वे मंत्री असतानाही कोकणात रेल्वेसाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न केला. मी महाराष्ट्र सरकारला धन्यवाद आणि अभिनंदन करतो, असं शिंदे यावेळी म्हणाले.

‘गोव्याची प्रसिद्धी आम्हाला सिंधुदुर्गात हवी’

तीन वर्षांपूर्वी एक विमान आलं होतं. आज त्याच ठिकाणी एक नव्या विमानतळाच्या उद्घाटनाचा श्रीगणेशा आम्ही एकत्र मिळून करत आहोत. कोकणाला प्राकृतिक सौंदर्य आहे. आंबे, काजू, मासे हे सगळे व्यवसाय आम्हाला देशात प्रसिद्ध करायचे आहेत. सिंधुदुर्गात किल्ला, समुद्र तट, मंदिरं, असं सगळं आहे. गोव्याची प्रसिद्धी आम्हाला सिंधुदुर्गात हवी आहे. गोवा जवळ आहे. इथे पर्यटनाचं केंद्र आम्हाला हवं आहे. आज सुरुवात झाली, ही फक्त सुरुवात आहे. 500 किमीचं अंतर 50 मिनिटात पार करणार आहोत. पुढच्या काही दिवसात 20-25 फ्लाईट सिंधुदुर्गात पाहिजे. पंतप्रधान मोदी यांनी लोकल फॉर ग्लोबलची घोषणा केली आहे. आम्ही सिंधुदुर्गाचा नक्कीच तसा विकास करु. पंतप्रधानांच्या नेतृत्वात काम करु, असा दावाही ज्योतिरादित्य शिंदे यांनी यावेळी केलाय.

इतर बातम्या :

‘खोटं बोलणारी लोकं बाळासाहेबांना आवडत नव्हती, म्हणून अशा लोकांना त्यांनी पक्षातून काढलं’, उद्धव ठाकरेंचा पलटवार

‘जे इन्फ्रास्ट्रक्चर दिसतंय त्यात राणेंचं योगदान, दुसरा कुणी इथं येऊच शकत नाही’, उद्धव ठाकरेंसमोर राणेंचा हल्लाबोल

Chipi Airport will be a major contributor to development of Sindhudurg, says Jyotiraditya Scindia