महाजनांनी सेल्फी काढला नाही, धान्याच्या पाकिटावर महाराष्ट्र सरकारचेच स्टिकर : मुख्यमंत्री

| Updated on: Aug 10, 2019 | 5:09 PM

पूरग्रस्त भागात सरकारकडून केली जाणारी मदत किंवा अन्न- धान्याच्या पाकिटावर भाजप नेत्यांच्या फोटोबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं. सांगली भागात पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विविध मुद्यांवर भाष्य केलं.

महाजनांनी सेल्फी काढला नाही, धान्याच्या पाकिटावर महाराष्ट्र सरकारचेच स्टिकर : मुख्यमंत्री
Follow us on

सांगली : पूरग्रस्त भागात सरकारकडून केली जाणारी मदत किंवा अन्न- धान्याच्या पाकिटावर भाजप नेत्यांच्या फोटोबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं. “सरकारकडून मदत मिळत असल्याने त्यावर केवळ महाराष्ट्र शासनाचं स्टिकर असणे गरजेचे आहे. त्याव्यतिरिक्त कोणतेही अन्य स्टिकर या पाकिटांवर लावू नये”, असं मुख्यमंत्री म्हणाले. पूरग्रस्त सांगली भागात पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विविध मुद्यांवर भाष्य केलं.

सांगली-कोल्हापूरातील पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या अन्नाच्या पाकिटांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कोल्हापुरातील इचलकरंजीचे भाजप आमदार सुरेश हळवणकर यांचे फोटो आहेत. त्यावरुन विरोधक आणि पूरग्रस्तांनी सरकारवर संताप व्यक्त केला. त्याबाबत स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री म्हणाले, “अन्न-धान्याच्या पाकिटावर स्टिकर लावणे गरजेचे आहे. ही मदत सरकारकडून मिळत असल्याचे स्पष्ट होण्यासाठी त्यावर महाराष्ट्र शासन एवढं लिहणे पुरेसे आहे”

सांगली-कोल्हापूरातील पूरग्रस्तांना प्रति कुटुंब दहा किलो धान्य वाटप करण्यात येत आहे. मात्र या धान्य वाटपाच्या मदतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह, आमदार तहसीलदार प्रांताधिकारी यांची नावे लिहिली आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या मदतकार्याचे भाजपकडून मदतीचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.

सांगली आणि कोल्हापूर शहराला गेल्या आठवडाभरापासून महापुराचा फटका बसला आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (CM Devendra Fadnavis) यांनी सांगली शहराला भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आढावा बैठकीची माहिती सांगली आणि कोल्हापूरच्या सर्व परिस्थितीची माहितीदिली.

पूरस्थितीचा आढाव घेणे महत्त्वाचे 

या बैठकीवेळी मुख्यमंत्र्यांना तुम्ही सांगलीवाडीत का गेला नाही अशी विचारणा करण्यात आली. त्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, “मला बोटीतून सांगलीवाडीत जाणार का अशी विचारणा करण्यात आली. मी मात्र याला स्पष्ट नकार दिला. मी मुख्यमंत्री असल्याने माझ्यासाठी एक बोट अडवायची. त्यानंतर माझ्या सुरक्षेसाठी आणखी दोन बोटी लागणार या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मी यासाठी स्पष्ट नकार दिला. माझे काम येथील पूरपरिस्थितीचा आढावा घेणे आहे. त्यामुळे मला हे सर्व करण्याची काहीही गरज नाही”

‘महाजनांनी सेल्फी घेतला नाही’

यावेळी मुख्यमंत्र्यांना जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांच्या बोटीतील सेल्फी व्हिडीओबाबत विचारणा करण्यात आली. मात्र मुख्यमंत्र्यांनी महाजनांची पाठराखण करत मीडियावरच खापर फोडलं.

“सांगलीत भीषण पूरस्थिती पाहून मी स्वत: गिरीश महाजनांना सांगितले की आम्ही कोणीही त्याठिकाणी पोहोचू शकत नाही. आमचे हेलिकॉप्टर खाली उतरता येणे शक्य नाही. त्यामुळे तुम्ही कोल्हापुरातून तिथे जा आणि त्या ठिकाणी परिस्थिती सांगा. त्यानुसार गिरीश महाजन कोल्हापुरातून सांगलीत गेले. तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी जे कोल्हापुरातून त्यांना सोडण्यासाठी आले होते त्यांना हात दाखवला. याचवेळी प्रसारमाध्यांनी त्यांचे फोटो काढून दाखवले. उलट ज्या ठिकाणी लोक पोहचू शकत नाहीत, तिथे गिरीश महाजन पोहोचले, त्यामुळे लोकांना दिलासा मिळाला” असे सांगत मुख्यमंत्र्यांनी गिरीश महाजनांची पाठराखण केली.