‘एनडीए’बाहेर पडलेल्या दोन पक्षांची भेट, अकाली दलाचे नेते उद्धव ठाकरेंच्या भेटीला

| Updated on: Dec 06, 2020 | 1:24 PM

शेतकरी आंदोलनावर शिरोमणी अकाली दलाची भूमिका मान्य असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटीदरम्यान सांगितले.

एनडीएबाहेर पडलेल्या दोन पक्षांची भेट, अकाली दलाचे नेते उद्धव ठाकरेंच्या भेटीला
Follow us on

मुंबई : ‘एनडीए’तून बाहेर पडलेल्या दोन पक्षांची एकजूट होताना दिसत आहे. शिरोमणी अकाली दलाचे उपाध्यक्ष आणि खासदार प्रेमसिंग चंदू माजरा (Prem Singh Chandumajra) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या भेटीसाठी मुंबईत आले. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली. शेतकऱ्यांच्या सर्व आंदोलनांना शिवसेनेने पाठिंबा दिला असून दिल्लीच्या समन्वय बैठकीमध्येही शिवसेना सहभागी होणार आहे. (CM Uddhav Thackeray lends support to Shiromani Akali Dal in Farmer Protest against Modi Government)

अकाली दल-शिवसेना भेटीचं कारण काय?

“केंद्र सरकारने लागू केलेला कृषी कायदा मोडीत काढण्यासाठी देशातील सर्व स्थानिक पक्षांच्या प्रमुख नेत्यांची आम्ही भेट घेत आहोत. सर्व पक्षांनी एकत्र यावे, यासाठी आम्ही हे आव्हान करत आहोत” अशी प्रतिक्रिया खासदार प्रेमसिंग चंदू माजरा यांनी यावेळी दिली. शिरोमणी अकाली दलाची भूमिका मान्य असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटीदरम्यान सांगितले.

बादलांच्या नेतृत्वात दिल्लीत सर्वपक्षीय एकजूट

“राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही आम्ही आज भेट घेणार आहोत, मात्र ती झाली नाही तर दिल्लीमध्ये आम्ही देशातील सर्व स्थानिक राजकीय पक्षांची बैठक घेणार आहोत. त्या बैठकीचे नेतृत्व शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख प्रकाशसिंग बादल हे करणार आहेत” अशी माहितीही माजरा यांनी दिली.

दिल्लीच्या समन्वय बैठकीमध्ये शिवसेना सहभागी होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित राहणार असल्याचं सांगितल्याची माहिती माजरा यांनी दिली. शरद पवारांपासून ममता बॅनर्जीपर्यंत अनेक पक्षांचे प्रमुख नेते, पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून ही बैठक पुढील दोन महिन्यात होणार आहे.

मोदी सरकारविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरुद्ध दिल्लीच्या सीमांवर हजारो शेतकऱ्यांचं गेल्या दहा दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची पाहायला मिळाली. त्यामुळे बॉर्डर बंद करण्यात आल्या. त्यानंतर पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये सहमती झाली आणि शेतकरी दिल्लीहून नोयडाला येणाऱ्या रस्त्यावरुन बाजूला हटले. मात्र, रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला त्यांनी आंदोलन सुरुच ठेवलं

बादल यांची पुरस्कार वापसी

केंद्राच्या कृषी कायद्याविरुद्ध आणि शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाशसिंह बादल यांनी केंद्राचा पद्म विभूषण पुरस्कार परत केला. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी पंजाबमधील खेळाडूही पुढे आले आहेत. त्यांनीही अवॉर्ड वापसी मोहीम हाती घेतली आहे.

अकाली दलाचा भाजपला धक्का

मोदी सरकारने आणलेल्या कृषी विधेयकाचा विरोध म्हणून शिरोमणी अकाली दलाने सप्टेंबर महिन्यात थेट राष्ट्रीय लोकशाही आघाडीतूनच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आधी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अकाली दलाच्या एनडीएबाहेर पडण्याच्या पवित्र्याने भाजपला मोठा धक्का बसला होता. (CM Uddhav Thackeray lends support to Shiromani Akali Dal in Farmer Protest against Modi Government)

पवारांकडून अकाली दलाचे स्वागत

‘कृषी विधेयकाच्या निषेधार्थ प्रकाशसिंग बादल यांच्या नेतृत्वात एनडीएतून बाहेर पडलेले अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल आणि खासदार हरसिमरत बादल यांचे अभिनंदन, शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल धन्यवाद!’ असे ट्विट करत शरद पवार यांनी अकाली दलाच्या निर्णयाचे स्वागत केले होते.

जेव्हा शिवसेना बाहेर पडली होती…

शिवसेना भाजप 28 वर्ष एनडीएत एकत्र नांदत होती. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपमध्ये दरी निर्माण झाली. याचं रुपांतर युती तुटण्यात झालं. अखेर महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्याअगोदर केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सेनेने आपण एनडीमधून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं.

सेना-अकाली दलाच्या एक्झिटनंतर भरपाई

शिवसेना आणि अकाली दल या दोन महत्त्वाच्या मित्रपक्षांनी ‘एनडीए’तून बाहेरचा रस्ता धरल्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई भाजपने केली. दोन्ही पक्षांच्या राज्यसभेत प्रत्येकी तीन-तीन अशा एकूण सहा जागा होत्या. मात्र भाजपने या निवडणुकीत ही भरपाई केली. एनडीएचे एकूण संख्याबळ 112 इतके राखता आले आहे.

नांदेडच्या गुरुद्वारा संबंधित कायद्यात बदल करावे अशी मागणी केली. पूर्वीचा कायदाच कायम करावा, अशी मागणी केली असता नवीन कायदा करण्याबाबत महाराष्ट्र सरकारने सांगितल्याचं माजरा म्हणाले.

(CM Uddhav Thackeray lends support to Shiromani Akali Dal in Farmer Protest against Modi Government)