उद्धव ठाकरेंची थोरातांनंतर पृथ्वीराज चव्हाणांशी चर्चा, राजस्थान सत्तासंघर्षानंतर मुख्यमंत्री सावध

| Updated on: Jul 19, 2020 | 2:41 PM

राजस्थानमधील सत्तासंघर्षाचे पडसाद आता महाराष्ट्रातील राजकारणातही बघायला मिळत आहे (CM Uddhav Thackeray meet with Prithviraj Chavan).

उद्धव ठाकरेंची थोरातांनंतर पृथ्वीराज चव्हाणांशी चर्चा, राजस्थान सत्तासंघर्षानंतर मुख्यमंत्री सावध
Follow us on

मुंबई : राजस्थानमधील सत्तासंघर्षाचे पडसाद आता महाराष्ट्रातील राजकारणातही बघायला मिळत आहे (CM Uddhav Thackeray meet with Prithviraj Chavan). राजस्थानमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांशी संवाद वाढवण्यास सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे यांनी काल (17 जुलै) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली (CM Uddhav Thackeray meet with Prithviraj Chavan).

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत सत्तेतील घटक पक्षांशी संवाद वाढवा, असा सल्ला मुख्यमंत्र्यांना दिला होता. त्यानंतर राजस्थानमधील राजकीय घडामोडींनादेखील वेग आला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी गेले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आता सावध पवित्रा घेतला आहे.

हेही वाचा : मुख्यमंत्री आणि बाळासाहेब थोरातांची तासभर बैठक, राजस्थानातील सत्तासंघर्षानंतर ठाकरे सावध

दरम्यान, चार दिवसांपूर्वी (13 जुलै) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूल मंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांची बैठक पार पडली. शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात जवळपास तासभर बैठक झाली. या बैठकीला नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

राजस्थानमध्ये काँग्रेस अंतर्गत सुरू असलेल्या नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची महाराष्ट्र काँग्रेसमध्ये चाचपणी सुरु केली आहे. महाविकासाआघाडी सरकारला फटका बसू नये यासाठी काँग्रेसची नाराजी दूर करण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

गेल्या आठवड्यात झालेल्या मुंबई पोलीस उपायुक्तांच्या बदल्या रद्द करण्यावरुन वाद निर्माण झाला होता. यानंतर आधी चर्चा-मग बदल्या असे सूत्र महाविकासआघाडीत ठरले आहे. त्यानुसार बदल्या करण्याआधी महाविकासआघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षाचे नेते चर्चा करणार आहेत.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या काही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत नाराजीचे मुद्दे मांडले होते.

यावेळी कोणताही निर्णय घेताना मुख्यमंत्री विश्वासात घेत नाहीत. हवे असलेले प्रशासकीय अधिकारी मिळत नाही अशी मागणी काँग्रेसच्या मंत्र्यांनी केली होती. त्यामुळे लवकरच महसूल खात्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अपेक्षित असल्याचे बोललं जात आहे.