वाढत्या महागाईविरोधात काँग्रेस आक्रमक, रविवारी केंद्र सरकारविरोधात राज्यभरात आंदोलन, मोदींना पाठवणार सिलिंडर

| Updated on: Jan 15, 2022 | 6:44 PM

अच्छे दिनचे स्वप्न दाखवणाऱ्या  केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुष्कील केले आहे. इंधन व गॅस दरवाढीमुळे महागाई प्रंचड प्रमाणात वाढल्याने महिलांचे किचन बजेट कोलमडले आहे. याविरोधात रविवारी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी दिली आहे.

वाढत्या महागाईविरोधात काँग्रेस आक्रमक, रविवारी केंद्र सरकारविरोधात राज्यभरात  आंदोलन, मोदींना पाठवणार सिलिंडर
संध्या सव्वालाखे, महिला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा
Follow us on

मुंबई : अच्छे दिनचे स्वप्न दाखवणाऱ्या  केंद्रातील नरेंद्र मोदी (Narendra Modiसरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुष्कील केले आहे. इंधन व गॅस दरवाढीमुळे महागाई प्रंचड प्रमाणात वाढल्याने महिलांचे किचन बजेट कोलमडले आहे. उज्ज्वला गॅसची सबसीडी कमी केल्याने गरीब महिलांना गॅस सोडून पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महिला काँग्रेसच्या (Women Congress) वतीने रविवारी राज्यातील सर्व जिल्ह्यांत आंदोलन करण्यात येणार असून उज्ज्वला योजनेचे गॅस सिलिंडर परत करून मोदी सरकारचा निषेध केला जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे (Sandhya Savvalakhe)  यांनी दिली आहे.

महिलांचे बजेट कोलमडले

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना सव्वालाखे यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. त्या म्हणाल्या की, महागाई वाढवून केंद्र सरकारने महिलांच्या संक्रांतीच्या उत्साहावर विरजण टाकण्याचे काम केले आहे. इंधन दरवाढीमुळे जीवनाश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. पंतप्रधान मोदींनी मोठा गाजावाजा करून महिलांना उज्ज्वला योजनेमार्फत मोफत गॅस देण्याची घोषणा केली. मात्र आता गॅस सिलिंडरच्या किंमती प्रचंड वाढल्याने महिलांना गॅस घेणे परवडत नाही. उज्ज्वला योजनेच्या बहुतांश लाभार्थ्यांनी आता सिलिंडर अडगळीत टाकले असून, त्या महिला पुन्हा चुलीवर स्वयंपाक करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने हे सिलिंडर मोदींना पाठवून या दरवाढीचा निषेध करण्यात येणार आहे. रविवारी राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सव्वालाखे यांनी यावेळी दिली.

काँग्रेस कमिट्यांमध्ये महिला कार्याध्यक्ष नियुक्तीचा निर्णय

राज्यातील सर्व जिल्हा काँग्रेस कमिट्यांमध्ये एका महिलेला कार्याध्यक्ष म्हणून नियुक्त करण्याची घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली या बद्दल महिला काँग्रेसच्या वतीने त्यांचे यावेळी आभार व्यक्त करण्यात आले. संध्या सव्वालाखे यांची महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली त्याला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या एक वर्षाच्या काळात महिला काँग्रेसच्या वतीने महागाई विरोधात राज्यभरात आंदोलने करण्यात आली. पूरग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात मदतकार्य करण्यात आले. मुलींसाठी कराटे व स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. लीगल सेल मार्फत कोरोना काळात कौटुंबिक हिंसाचाराचा सामना करणा-या महिलांना कायदेशीर मदत दिली. तसेच शक्ती कायदा आणण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

तृतीयपंथी सेलच्या अध्यक्षपदी पवन यादव यांची नियुक्ती

समाजात दुर्लक्षित तृतीयपंथीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अंतर्गत तृतीयपंथी सेलची स्थापना करण्यात आली असून, या सेलच्या अध्यक्षपदी अॅड. पवन यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पवन या कायद्याच्या पदवीधर असून, मुंबई न्यायालयात वकिली करतात तसेच सारथी फाऊंडेशनच्या माध्यमातून त्या तृतीयपंथीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत आहेत.

संबंधित बातम्या

VIDEO: भ्रष्टाचार करायलाही अक्कल लागत नाही, पालिकेत स्थायी समिती अध्यक्षांची ‘वाझेगिरी’; आमदार साटम यांची टीका

बँकेची सत्ता हाती येताच बाळासाहेबांचा फोटो उतरवला, फक्त राणेंचा फोटो लावला; शिवसेनेकडून संताप व्यक्त

शिवसेना नेत्याचा पतंग उंच आकाशात, भाजप नेत्याच्या हाती चक्री, औरंगाबादेत राजकीय पतंगबाजी, चर्चांना उधाण!