पालिका निवडणुकीत महाविकासआघाडी होणार की नाही? काँग्रेसने राष्ट्रवादी-शिवसेनेला धडकी भरवली

| Updated on: Feb 23, 2021 | 8:34 PM

या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या रणनितीवर चर्चा करण्यात आली. पालिका निवडणुकीबाबत काँग्रेसने महत्त्वाचा निर्णय घेतलाय.

पालिका निवडणुकीत महाविकासआघाडी होणार की नाही? काँग्रेसने राष्ट्रवादी-शिवसेनेला धडकी भरवली
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक आज (23 फेब्रुवारी) मुंबईत पार पडली. या बैठकीत केंद्रातील काळे कृषी कायदे, कामगार कायदे व वाढती इंधनदरवाढ यासह राजकीय विषयांवर चर्चा झाली. याशिवाय पालिका निवडणुकीबाबत काँग्रेसने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या रणनितीवर चर्चा करण्यात आली. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आघाडी करण्यासंदर्भातील निर्णय स्थानिक पातळीवर चर्चा करुन घेतला जाईल, असं जाहीर करण्यात आलं. या निर्णयामुळे राष्ट्रवादी-शिवसेनेला धडकी बसण्याची शक्यता आहे (Congress declared decision on MVA alliance in local body Election).

काँग्रेसच्या बैठकीत संघटना आणि सरकारच्या कामकाजाबाबतही चर्चा करण्यात आली. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली. ‘एक दिवस शेतकऱ्यांसोबत’ हा कार्यक्रम राबवण्याबाबतही चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी संकल्प अभियान राबवले जाणार आहे. त्यासाठी 6 महिन्यांचा कार्यक्रम अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने दिला आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी दिली.

नाना पटोले म्हणाले, “शेतकरी विरोधी कायद्यांना काँग्रेसने सुरुवातीपासूनच तीव्र विरोध केलाय. हे कायदे रद्द करेपर्यंत काँग्रेस पक्षाचा संघर्ष सुरुच राहणार आहे. केंद्रातील हे काळे कायदे महाराष्ट्रात लागू करू नयेत. शेतकरी हिताचा विचार करुन आवश्यक ते कायदे राज्यात आणू.”

काँग्रेसच्या बैठकीतील 4 ठराव

1. केंद्राचे शेतकरी व कामगार विरोधी कायदे त्वरीत रद्द करावेत. केंद्राचे हे कायदे महाराष्ट्रात लागू करू नये, परंतु शेतकऱ्यांसाठी नवीन आवश्यक कायदा करावा.

2. वैधानिक मंडळे त्वरीत स्थापन करून त्यानुसार निधीचे वितरण व्हावे.

3. मराठा व मुस्लीम आरक्षणाला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असून कुठल्याही इतर आरक्षणाला धक्का न लावता या दोन्ही समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे.

4. राज्यातील आदिवासी, मागासवर्गीय समाज, ओबीसी, भटक्या जाती, अल्पसंख्याक समाजाला न्याय देण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात यावी आणि तरतूद लॅप्स होऊ नये म्हणून कायदा करण्यात यावा.

बैठकीच्या सुरुवातीला दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. काँग्रेस पार्लमेंटरी बोर्डाची बैठक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, काँग्रेसचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे मंत्री, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व निवड मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा :

सांगली जिंकली, आता सगळीकडे भाजपला धोबीपछाड देऊ; काँग्रेसला विश्वास

शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राहुल गांधी वायनाडमध्ये, काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत ट्रॅक्टरही चालवला

KDMC Election 2021 Ward No 10 Titwala : कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक, वॉर्ड 10 टिटवाळा

व्हिडीओ पाहा :

Congress declared decision on MVA alliance in local body Election