विशेष विमानाने काँग्रेस आमदार जयपूरवरुन मुंबईत, आता कुठे जाणार?

| Updated on: Nov 13, 2019 | 6:34 PM

राज्यात फसलेला सत्तास्थापनेचा पेच आता लवकरच सुटण्याची शक्यता आहे.

विशेष विमानाने काँग्रेस आमदार जयपूरवरुन मुंबईत, आता कुठे जाणार?
Follow us on

मुंबई: राज्यात फसलेला सत्तास्थापनेचा पेच आता लवकरच सुटण्याची शक्यता आहे. आमदारांची फोडाफोडी होऊ नये म्हणून काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना राजस्थानमधील जयपूर (Congress MLA return from Jaipur) येथे पाठवले होते. त्यानंतर आज हे सर्व आमदार विशेष विमानाने मुंबईत परतले (Congress MLA return from Jaipur) आहेत. त्यामुळे काँग्रेस आता काहीशी निश्चिंत झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.

काँग्रेसचे सर्व आमदार दुपारी चार वाजता विशेष विमानाने मुंबईत दाखल झाले. या आमदारांच्या स्वागतासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते विमानतळावर हजर होते. यात माणिकराव ठाकरे, विजय वडेट्टीवार हेही उपस्थित होते. सर्व आमदार एकत्र आल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी विमानतळावरच आमदारांशी काही काळ चर्चा केली. थोरातांनी या आमदारांना काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्या. त्यानंतर हे आमदार आपआपल्या घरी परतले आहेत.

महासेनाआघाडीचा ‘किमान समान कार्यक्रम’ काय असणार?

दरम्यान, शिवसेनेसोबत सत्तास्थापन करताना महासेनाघाडीचं किमान समान कार्यक्रम काय असणार याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचा संयुक्त जाहीरनामा आणि शिवसेनेचा वचननामा घेऊन त्यातील कोणते मुद्दे घ्यायचे आणि कोणते मुद्दे वगळायचे हे ठरवले जाईन. किमान समान कार्यक्रम तयार करताना वादग्रस्त मुद्यांचे काय करायचं हेही या चर्चेत ठरावावं लागणार आहे. पहिल्यांदा किमान समान कार्यक्रमाबाबत चर्चा करावी लागेल. त्यासाठी आधी याबाबत आमच्या पक्षात चर्चा करू. त्यानंतर राष्ट्रवादीशी चर्चा करू. त्यानंतर सत्ता वाटप सूत्र आणि शिवसेनेला पाठिंबा याबाबत चर्चा होईन.”

मुख्यमंत्रिपदाविषयी विचारणा केली असता पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यावर बोलणं टाळलं आहे. ते म्हणाले, “मुख्यमंत्रिपदाबाबत मी काहीही बोलणार नाही. सत्ता वाटपाच्या सूत्रात यावर चर्चेत निर्णय होईन.” शिवसेना आणि आमचं जुळू नये याचा भाजप प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.