पक्षाचे अध्यक्ष कोण व्हावं? काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर म्हणतात….

| Updated on: Aug 24, 2020 | 3:21 PM

महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश धानोरकर उर्फ बाळू धानोरकर यांनी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण व्हावं, यावर भाष्य केलं आहे (Congress MP Balu Dhanorkar on Congress President ).

पक्षाचे अध्यक्ष कोण व्हावं? काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर म्हणतात....
Follow us on

चंद्रपूर : काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन पक्षाच्या कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण होणार? असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. तसेच काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पक्षामध्येच दोन गट पडल्याचे दिसत आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश धानोरकर यांनी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण व्हावं, यावर भाष्य केलं आहे (Congress MP Balu Dhanorkar on Congress President ).

“गांधी कुटुंबच पक्षाला यशाकडे नेऊ शकतं. 2014 पासून ते आजपर्यंत या सहा वर्षांच्या काळात गांधी कुटुंबाने भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी जर राजीनामा देत असतील तर खासदार राहुल गांधी किंवा काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पक्षाची सूत्रे हाती घ्यावी. आता 2024 च्या निवडणुका जिंकण्याची तयारी करावी”, अशी प्रतिक्रिया खासदार सुरेश धानोरकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना दिली (Congress MP Balu Dhanorkar on Congress President).

दरम्यान, काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीची (CWC) आज महत्त्वाची बैठक झाली (CWC Meeting). काँग्रेस पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. ही बैठक सकाळी 11 वाजता सुरु झाली (CWC Meeting). या बैठकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, नारायण स्वामी, भुपेश बघेल, कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

या बैठकीपूर्वी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी सोनिया गांधी यांनी पक्षाची धुरा आपल्या हातात घ्यावी अशी इच्छा व्यक्त केली. तर काहींनी राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष पद सोपवण्यात यावं अशी मागणी केली. मात्र, बैठकीत सोनिया गांधी पत्र लिहिणाऱ्या 23 नेत्यांबाबत नाराजी व्यक्त करत पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर एकमताने राहुल गांधी यांना पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

पक्षाच्या पुनर्रचनेबाबत नेत्यांचं सोनिया गांधींना पत्र

काँग्रेसच्या 23 नेत्यांनी पक्षाच्या पुनर्रचनेबाबत सोनिया गांधी यांना पत्र पाठवले आहे. यामध्ये महाराष्ट्राचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचादेखील समावेश आहे.

काँग्रेसमध्ये अद्याप सोनिया गांधी यांच्या जागेवर कुणाला घेण्यात यावं याबाबत संभ्रम आहे. पत्रावर स्वाक्षरी केलेल्या काही नेत्यांच्या मते ते पत्रात लिहिलेल्या सर्व बाबींशी सहमत नाहीत. तरी, या पत्रातून त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहे, ज्यावर विचार व्हायला हवा. मात्र, काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी काँग्रेस परिवाराबाहेरील अध्यक्ष निवडण्यास विरोध दर्शवला आहे.

संबंधित बातम्या :

अध्यक्ष झाल्यानंतर राहुल गांधींनी जर सांगितलं, तर महाराष्ट्रातील सत्ता सोडू : विजय वडेट्टीवार

भाजपसोबत हातमिळवणीचे आरोप, राहुल गांधींवर भडकलेले कपिल सिब्बल पुन्हा शांत