भाजपच्या भाडोत्री ट्रोलर्सकडून काँग्रेस नेत्यांना ट्रोल करण्याचं काम सुरु, नाना पटोलेंचा आरोप

| Updated on: Apr 22, 2021 | 7:11 PM

भाजपने त्यांच्या भाडोत्री ट्रोलर्सकडून आमच्या नेत्यांना ट्रोल करण्याचं काम केलं, असा आरोप नाना पटोले यांनी केलाय.

भाजपच्या भाडोत्री ट्रोलर्सकडून काँग्रेस नेत्यांना ट्रोल करण्याचं काम सुरु, नाना पटोलेंचा आरोप
नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
Follow us on

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतात सुरु असलेल्या लसीकरण मोहीमेबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहिलंय. त्यात देशात सर्वत्र लसीची समान किंमत ठेवण्याची मागणी सोनिया गांधी यांनी केलीय. त्यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार टीका केलीय. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मनमोहन सिंग यांनी सातत्याने पंतप्रधान मोदी, आरोग्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना कोरोनाच्या परिस्थितीबाबत वारंवार अवगत केलं. पण त्यांच्या माफक सूचनांकडे भाजपकडून फक्त उलट प्रतिक्रिया देण्यात आल्या. भाजपने त्यांच्या भाडोत्री ट्रोलर्सकडून आमच्या नेत्यांना ट्रोल करण्याचं काम केलं, असा आरोप नाना पटोले यांनी केलाय. (Nana Patole’s serious allegations against BJP leaders after sonia gandhi’s letter to PM Modi)

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. तो रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊनचं पाऊल उचललं आहे. आम्हाला लोकांचा जीव वाचवणं महत्वाचं वाटतं. त्यामुळे आजपासून राज्यात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. जनतेनं या निर्णयाचं स्वागत केलंय. लॉकडाऊनचं पालनही होईल आणि महाराष्ट्र देशातील पहिलं कोरोनामुक्त राज्य ठरेल, असा दावाही पटोले यांनी केलाय.

सोनिया गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र

सोनिया गांधी यांनी कोरोना लसीकरणाच्या प्रक्रियेबाबत चिंता व्यक्त केलीय. गुरुवारी सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विनंती केली आहे की, लसीकरणाच्या प्रक्रियेत बदल करण्यात यावा, तसंच संपूर्ण देशात लसीची किंमत समान असावी. केंद्र सरकारने 18 ते 45 वर्षे वयोगटातील लोकांना मोफत लस देण्याची आपली जबाबदारी झटकल्याची टीकाही सोनिया गांधी यांनी केलीय. सोनियांनी तसं एक पत्रच पंतप्रधान मोदींना लिहिलं आहे.

गेल्या वर्षीचा कटू अनुभव गाठीशी असताना आणि लोकांना झालेल्या त्रासाची माहिती असतानाही सरकार सातत्याने मनमानी आणि भेदभावपूर्ण नितीने काम करत आहे, याबाबत आश्चर्य वाटतं, असंही सोनियांनी आपल्या पत्रात म्हटलंय. केंद्र सरकारने 18 ते 45 वर्षे वयोगटातील लोकांना मोफत लस देण्याची आपली जबाबदारी झटकली आहे. केंद्राचं हे काम म्हणजे युवकांप्रति असलेल्या आपल्या उत्तरदायित्वापासून पळ काढणं असल्याची टीकाही सोनियांनी केलीय.

केंद्र सरकारनं पुनर्विचार करावा

देशातील नागरिकांना लसीकरणासाठी जास्तीची किंमत मोजावी लागेल. राज्य सरकारांवरही त्याचा बोजा पडेल. देश संकटात असताना कोणतंही सरकार लोकांना त्रास देत नफेखोरीसाठी मोकळं रान कसं काय देऊ शकतं? असा सवालंही सोनिया गांधी यांनी आपल्या पत्रातून विचारलाय. कोरोना लसीकरणाच्या प्रक्रियेचा पुनर्विचार केंद्र सरकारनं करायला हवा. संपूर्ण देशात लसीची समान किंमत असावी, अशी मागणी सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदींकडे केलीय.

संबंधित बातम्या :

कोरोनापासून वाचण्यासाठी कोणता मास्क वापराल, WHO ने जारी केलेल्या ‘या’ सूचना नक्की वाचा

‘अदर पुनावाला ‘डाकू’, सीरम इन्स्टिट्यूट ताब्यात घ्या’, भाजप आमदाराने तारे तोडले

Nana Patole’s serious allegations against BJP leaders after sonia gandhi’s letter to PM Modi