Deepali Chavhan Suicide : प्रत्येक आरोपित व्यक्तीचा बचाव-संरक्षण करण्याचाच सरकारचा अट्टाहास का? -फडणवीस

| Updated on: Apr 02, 2021 | 3:21 PM

आम्हाला प्रश्न पडला आहे की, प्रत्येक आरोपित व्यक्तीचा बचाव-संरक्षण करण्याचाच या मविआ सरकारचा अट्टाहास का? असा सवाल फडणवीस यांनी विचायरलाय.

Deepali Chavhan Suicide : प्रत्येक आरोपित व्यक्तीचा बचाव-संरक्षण करण्याचाच सरकारचा अट्टाहास का? -फडणवीस
RFO दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र
Follow us on

मुंबई : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरीसाल इथं वनपरिक्षेत्र अधिकारी पदावर दबंग कामगिरी करणाऱ्या दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणात वनविभागातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. पण या प्रकरणी आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरलंय. प्रत्येक टप्प्यासाठी आंदोलन. त्याशिवाय सरकार हलत नाही. आम्हाला प्रश्न पडला आहे की, प्रत्येक आरोपित व्यक्तीचा बचाव-संरक्षण करण्याचाच या मविआ सरकारचा अट्टाहास का? असा सवाल फडणवीस यांनी विचायरलाय. (Devendra Fadnavis’s letter to CM Uddhav Thackeray in RFO Deepali Chavan suicide case)

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे. ते पत्र त्यांनी ट्वीटरवर टाकलं आहे. यावेळी फडणवीसांनी RFO दीपाली चव्हाण प्रकरणात वरिष्ठ महिला आयपीएस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर जलदगती न्यायालयात खटला चालवा आणि विशेष सरकारी वरील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा अशी मागणीही फडणवीसांनी केली आहे.

आरोपीच्या बचावाचा अट्टाहास का?

‘खरे तर फौजदारी कारवाई सुरू असताना खातेनिहाय चौकशी आवश्यक असते. पण, तसे आदेश न काढता अंतर्गत चौकशी समिती नेमण्याचा घाट. प्रत्येक टप्प्यासाठी आंदोलन. त्याशिवाय सरकार हलत नाही. आम्हाला प्रश्न पडला आहे की, प्रत्येक आरोपित व्यक्तीचा बचाव-संरक्षण करण्याचाच या मविआ सरकारचा अट्टाहास का?’, असा सवालही फडणवीसांनी विचारला आहे.

आंदोलनानंतरच कारवाई का?

‘अवघ्या 28 वर्षांच्या वनपरीक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते, आरोप ज्यांच्यावर आहेत, त्यांची केवळ बदली होते. आंदोलनं झाल्यानंतरच अपर मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांचे निलंबन होते’, अशी खंतही फडणवीसांनी ट्वीटरवरुन व्यक्त केली आहे.

मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी निलंबित

RFO दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी DFO विनोद शिवकुमार यांच्यानंतर आता मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांचंही निलंबन करण्यात आलं आहे. महिला आणि बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याची चर्चा केली. त्यानंतर श्रीनिवास रेड्डी यांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले आहेत. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी रेड्डी यांच्या निलंबनाची मागणी लावून धरली होती.

दीपाली चव्हाण यांच्या सुसाईड नोटमध्ये गंभीर आरोप

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर मुख्य प्रधान सरंक्षक रेड्डी यांच्या नावे लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये दीपाली चव्हाण यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. त्यात खालील आरोपांचा समावेश आहे.

>> ऑक्टोबर २०२०मध्ये आपण आमझरी दौऱ्यावर असताना प्रेग्नंसीमुळे मी ट्रेक करु शकत नव्हते. याबाबत मी पियूषा मॅडमला सांगितले आणि घरी निघून गेले. पण यानंतर सलग तीन दिवस मला भाकूरमध्ये कच्च्या रस्त्यातून फिरवण्यात आले. त्यामुळे माझा गर्भपात झाला. पण त्यातसुद्धा मला सुट्टी दिली नाही. माझे सासर अमरावतीत आहे. पण महिन्यातून एकदाही मला घरी जाता येत नाही.

>> रात्री बेरात्री कुठेही भेटायला बोलवतात. अश्लील भाषेत बोलतात. मी याआधीही तुमच्याकडे तक्रार केली होती. पण तुम्ही तुमच्या अधिकाऱ्याची बाजू घेणार हे मला माहिती होती. त्यामुळे मी माझ्याच बदलीचा विचार करत होते. मेळघाट ही अशी दलदल आहे जिथे आम्ही आमच्या मर्जीने येऊ तर शकतो पण तुमच्या मर्जीशिवाय बाहेर जाऊ शक नाही. याच दलदलीत मी अडकत चालले आहे.

>> माझ्या रेंजमधील सर्व काम करुनही मला अद्याप याचे पैसे मिळाले नाहीत. मी मेडिकलवरुन कामावर रुजू होत नव्हते पण तुमच्यामुळे रुजू झाले. त्यावेळी तुम्ही त्यांच्याशी बोलाल असे आश्वासन दिले होते. पण त्यांच्या वागण्यात काहीही बदल झाला नाही. उलट दिवसेंदिवस त्यांचा माझ्यावरचा राग वाढत चालला असल्याचे दीपाली चव्हाण यांनी पत्रात म्हटले होते.

संबंधित बातम्या :

साताऱ्याची दीपाली, मेळघाटात वनअधिकारी, स्वत:वर गोळी झाडली, हादरवणारी सुसाईड नोट जशीच्या तशी

ना भान, ना बोलण्याची तमा, कथित अधिकाऱ्यासोबत दीपाली चव्हाण यांचं संभाषण

Devendra Fadnavis’s letter to CM Uddhav Thackeray in RFO Deepali Chavan suicide case