केंद्र सरकार निश्चित मदत करेल, पण आपण काय करणार आहात? ते सांगा, फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

| Updated on: Oct 20, 2020 | 10:34 AM

पहिल्यांदा आपण काय करणार आहोत हे निश्चित करणे जरुरीचं असेल, असेही फडणवीसांनी यावेळी म्हटलं. (Devendra Fadnavis Criticism on CM Uddhav Thackeray) 

केंद्र सरकार निश्चित मदत करेल, पण आपण काय करणार आहात? ते सांगा, फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान
Follow us on

उस्मानाबाद : “केंद्र सरकार निश्चित मदत करेल. यापूर्वीचे यूपीएच्या सरकारपेक्षा केंद्र सरकार मदत करेल. पण पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, ते आधी सांगा,” असा आव्हानात्मक प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला. काहीही झालं की, केंद्र सरकारकडे टोलवायचं. हे केंद्राने केलं पाहिजे, ते केंद्राने केलं पाहिजे, सर्व केंद्राने केलं पाहिजे,” असा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी लगावला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उस्मानाबाद दौऱ्याला सुरुवात करण्यापूर्वी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. (Devendra Fadnavis Criticism on CM Uddhav Thackeray)

“आमच्या काळात मोबाईलवर काढलेले फोटोही पंचनामा म्हणून ग्राह्य धरले जात होते. राज्य सरकारने आताही तेच करावे. त्याआधारे शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी. यानंतर दीर्घकालीन मदतीचा निर्णय घ्यावा,” असे फडणवीस यांनी सांगितले.

“काही झालं की, केंद्र सरकारकडे टोलवायचं. हे केंद्राने केलं पाहिजे, ते केंद्राने केलं पाहिजे, सर्व केंद्राने केलं पाहिजे. खरंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करुन या आपत्ती परिस्थितीत आम्ही आपल्यासोबत आहोत. केंद्र सरकार आपल्याला मदत करेल,” असं सागितल्याचे ते म्हणाले.

सगळं माहिती असताना केवळ राजकारण

“पण तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं की, मदतीला एक ते दीड महिना लागेल. कारण आधी पंचनामे होतील. मग पुढची प्रक्रिया होईल. त्यामुळे मदतीला वेळ लागेल. केंद्र सरकारची मदत कधी येते, याची संपू्र्ण कल्पना शरद पवार यांना आहे. कारण केंद्र सरकारमध्ये समिती असते. त्या समितीचे प्रमुख हे गृहमंत्री असतात. त्याचे सदस्य कृषीमंत्री आणि वित्तमंत्री असतात. राज्य सरकारला आधी असेस्मेंट करावं लागतं. आपल्या असेस्मेंटच्या आधारावर मेमोरांडेम पाठवावा लागतो. त्यानंतर एक टीम येते. ती टीम नुकसानीचा रिपोर्ट केंद्र सरकारला पाठवते. त्या आधारावर निर्णय घेतला जातो. ही अनेक वर्षांची पद्धत आहे.”

“शरद पवार कृषीमंत्री असतानादेखील हीच पद्धत होती. सगळं माहिती असताना केवळ राजकारण केलं जात आहे.  राज्यांकडे एसडीआरएफ असतो, त्यात केंद्र सरकारने एनडीआरएफच्या माध्यमातून अॅडव्हान्समध्ये पैसा दिलेला असतो. राज्य सरकारने एसडीआरएफमधून पैसा खर्च करायचा असतो. त्यात कमी पडले तर केंद्राकडून पैसे येतात तोपर्यंत राज्यांनी आपल्या बजेटमधून पैसे खर्च करायचा असतो. हे सगळं माहिती असताना केवळ राजकारण करायचं. केंद्र सरकार निश्चित मदत करेल. यापूर्वीचे यूपीएच्या सरकारपेक्षा केंद्र सरकार मदत करेल. पण पहिल्यांदा आपण काय करणार आहोत हे निश्चित करणे जरुरीचं असेल,” असेही फडणवीसांनी यावेळी म्हटलं.

सत्ताधाऱ्यांनी इतकं राजकीय बोलणं योग्य नाही

“केवळ सर्व्हे करण्यापुरता मर्यादित राहू नये. सरकारने शेतकऱ्यांना ठोस मदत करावी. मला यात राजकारण करायचं नाही. मी पहिल्या दिवसापासून राजकारण करत नाही. पण मला आश्चर्य वाटतं, जे सत्तेत असतात त्यांनी संयम दाखवायचा असतो. पण सत्तेतील लोकच इतकं राजकीय बोलत आहेत की, त्यांना शेतकऱ्यांशी काही देणंघेणं आहे की नाही हेच समजत नाही. सत्ताधाऱ्यांनी इतकं राजकीय बोलणं योग्य नाही. आता संवेदनशीलता दाखवली पाहिजे. संवेदनशीलता दाखवून शेतकऱ्याला मदत केली पाहिजे,” असेही फडणवीसांनी यावेळी म्हटलं. (Devendra Fadnavis Criticism on CM Uddhav Thackeray)

संबंधित बातम्या : 

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर शेतकऱ्यांना काय दिलासा मिळाला; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

 ‘राज्यात शरद पवारांएवढा जाणकार नेता नाही; पण ते सध्या मोजकंच बोलतायत’